मिर्झापुर -उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.प्रियंका यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यामुळे रस्त्यावरच धरणे आंदोलनाला बसलेल्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.
प्रियंका गांधींनी याविषयी एकानंतर एक ट्वीट करत मत मांडलं आहे.
“पीडितांना भेटल्यामुळे सरकार मला तुरुंगात टाकणार असेल, तर मी त्यासाठी तयार आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. खरं तर प्रशासनाची इच्छा असेल तर मी एकटीच पीडित कुटुंबीयांना भेटेल, असं मी सकाळीच स्पष्ट केलं होतं. पण असं असतानाही उत्तर प्रदेश सरकार तमाशा करत आहे. जनता सगळं काही पाहत आहे. मला पीडित आदिवासींना भेटू द्यावं, ही मागणी कायम आहे,” असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.
संध्याकाळपासून त्या या ठिकाणी ठिय्या मांडून बसल्या आहेत. पीडित कुटुंबाला भेटल्याशिवाय आपण परतणार नाहीत असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. पोलिसांनी त्यांना नारायणपूर येथे ताब्यात घेतलं आणि आता त्या मिर्झापूर येथील चुनार विश्राम गृहात थांबल्या आहेत.
बुधवारी एका जमिनीच्या वादातून सोनभद्रमध्ये हिंसाचार झाला होता. या ठिकाणी झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू तर 24 हून जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
प्रियंका यांनी सर्वप्रथम लखनऊमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. त्यानंतर पीडितांची भेट घेण्यासाठी त्या सोनभद्रकडे जात होत्या.
याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “मला फक्त पीडित कुटुंबीयांची भेट घ्यायची आहे. मी माझ्यासोबत फक्त 4 व्यक्ती घेऊन जाईन असं सांगितलं. पण प्रशासन मला त्याचीसुद्धा परवानगी देत नाही. आम्हाला का रोखण्यात आलं, हे त्यांनी सांगावं. तोपर्यंत आम्ही इथेच शांतपणे ठाण मांडून बसणार आहोत.”
“आम्ही आता झुकणार नाही. आम्ही शांतपणे पीडित कुटुंबीयांना भेटायला जात होतो. आता मला कुठे नेण्यात येत आहे, हे मला माहीत नाही. ते आम्हाला कुठेही नेणार असले तरी आम्ही जायला तयार आहोत,” असं त्यांनी एएनआयसोबत बोलताना सांगितलं.