मुंबई : रस्ते तयार करताना प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून योजना तयार केली जात आहे. यामध्ये रस्ता तयार करताना सिमेंटऐवजी प्लास्टिकच्या कचऱ्याचा उपयोग करण्यात यावा, यासाठीही सरकार प्रयोगशील आहे. आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत प्लास्टिक बंदीच्या नियमाच्या उल्लंघनाबाबत प्रश्न उपस्थित केला, त्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रस्ते बांधणीत प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर करणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी आहे, मात्र सरकार प्लास्टिकच्या कचऱ्याच्या विघटनावर काय करीत आहे, असा प्रश्न आमदार लोढा यांनी विधानसभेत उपस्थित केला. याबरोबरच त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की, प्लास्टिक बंदीनंतर २००हून अधिक कारखाने बंद झाले आहेत, त्यामुळे तब्बल १० हजार लोक बेरोजगार झाले आहेत. त्या बेरोजगार लोकांसाठी सरकारची काय योजना आहे. देशातील काही राज्यांमध्ये सरकारकडून प्लास्टिकच्या कचऱ्यापासून डिझेल तयार केले जात आहे, याबाबत सरकार काय विचार करीत आहे? प्लास्टिक बंदी असतानाही सुरू असलेल्या उल्लंघनावरील चर्चेत आमदार अजित पवार, मनिषा पवार, राज के पुरोहित यांनीही सहभाग दर्शविला. याशिवाय प्लास्टिक बंदीच्या नियमावरील कडक कायदे व नियमांचे होणारे उल्लंघन शिवाय प्लास्टिक बंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारचे लक्ष केंद्रीत केले.
पर्यावरण मंत्री कदम म्हणाले की, प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध असतानाही गुजरातहून महाराष्ट्रात प्लास्टिक आणले जात आहे. जे रोखण्याची मागणी गुजरात सरकारकडे करण्यात येणार आहे. सोबतच प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्ते तयार करण्याचे काम जलद गतीने व्हावे, यासाठी सरकार यासंदर्भात योजना तयार करणार आहे.