जम्मू-काश्मीर राज्यात नुकत्याच करण्यात आलेल्या बदलांमुळे तिथल्या जनतेला त्याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी व्यक्त केला आहे. इथली जनता देशातील इतर नागरिकांसारखे समान अधिकार, समान सुविधा आणि समान सुविधांचा लाभ आणि आनंद घेण्यासाठी समर्थ असतील, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे. ७३व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या अभिभाषणात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रपती म्हणाले, जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या जनतेला आता पुरोगामी आणि समतावादी कायदे आणि शिक्षणाच्या अधिकारांसंबंधीच्या तरतुदींचाही लाभ घेता येईल. तसेच माहिती अधिकार कायद्यामार्फत सार्वजनिक माहितीही मिळवता येईल. त्याचबरोबर वंचित समुदयाला शिक्षणातील आरक्षण, रोजगार तसेच इतर सुविधाही उपलब्ध होतील. तसेच तिहेरी तलाक सारखी अनिष्ठ प्रथा संपुष्टात आणल्याने आपल्या मुलींना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.