इतकी वर्षे राष्ट्रपिता, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज न मानणाऱ्याना देशद्रोही मानायचे नाही तर काय मानायचे ? असा सवाल डॉ चौधरी यांनी केला.
हुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ.कुमार सप्तर्षी
पुणे :’ इंग्रजांना घालवण्याइतकाच मोदीरूपी हुकूमशाही विरुद्धचा लढा महत्वाचा असून लोकसभा निवडणुकीद्वारे ही हुकूमशाही घालवताना आपण जराही चूक करता कामा नये ‘, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ कुमार सप्तर्षी यांनी केले .
‘मतदार जागृती परिषद’या मंचातर्फे २० जानेवारी रोजी मतदार जागृतीसाठी पुण्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते .
‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान ‘ विषयावर ही सभा झाली. सामाजिक कार्यकर्ते ,विचारवंत ,लेखक ,धर्मगुरू त्यात सहभागी झाले .
डॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक-अध्यक्ष युवक क्रांती दल) यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दिनांक २० जानेवारी २०१९,सकाळी ११ ते ३ यावेळेत एस. एम. जोशी सोशालिस्ट फौंडेशन, पत्रकार भवन शेजारी,नवी पेठ, पुणे येथे ही सभा झाली .
डॉ. विश्वंभर चौधरी (सामाजिक कार्यकर्ते),श्रीरंजन आवटे (युवा लेखक-कार्यकर्ते ),मौलाना निजामुद्दीन (धर्मगुरू),संजय सोनवणी (लेखक ),सुरेश खोपडे (निवृत्त पोलीस महानिरीक्षक),प्रशांत कोठडीया (मतदार जागृती परिषद) हे वक्ते सहभागी झाले . अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ . कुमार सप्तर्षी म्हणाले ,’मोदींचे हात रक्ताने रंगलेले असल्याने त्यांना आमचा गुजरात दंगलीपासून विरोध आहे. त्यांनी हुकूमशाही कारभार करून अघोषित आणिबाणीचाच कारभार केला . आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, महागठबंधन अशी त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येणार आहे.अशा वेळी काँग्रेस ला भाजपपेक्षा किमान एक जागा जास्त मिळावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत . आणीबाणीत सुरुवातीला जनतेला सुशासन आल्यासारखे वाटले होते ,मात्र ,शेवटी जुलूमाची जाणीव होऊन जनतेनेच निवडणूक हाती घेतली . आताही जनता हळूहळू का होईना ,पण मोदींना घालविण्यास सज्ज होत आहे . ‘
डॉ .सप्तर्षी पुढे म्हणाले ,’गांधींना विरोध करण्यासाठीच ब्रिटिश गुप्तहेर खात्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती केली. म्हणूनच संघाने स्वातंत्र्यलढयात भाग घेतला नाही. खरे हिंदुत्व सहिष्णू आहे,सत्य -अहिंसेला मानणारे आहे , म्हणून संघ -भाजपाने नकारात्मक हिंदुत्वाची प्रयोगशाळा उभारली आहे. इतर धर्मांचा द्वेष शिकवला जात आहे. हा सारा आटापिटा सत्तेसाठी आहे.तो यशस्वी होऊ देता कामा नये . यासाठी प्रत्येकाने जनजागृती चळवळीत भाग घ्यावा .
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ‘ राष्ट्रवाद: शोध आणि संवाद ‘ या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले.
डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले, ‘संघाकडे वैचारिक वारसा काही नाही. त्यामुळे त्यांना घाबरण्यासारखे काही नाही. शेतात उगवलेले तण काढायचे असेल तर ‘ पर्याय काय ? ‘ हा प्रश्न निरर्थक ठरतो. तिसरा पर्याय उभा राहिला नसल्याने काँग्रेस हाच पर्याय आहे. काँग्रेसबरोबर उभे राहिलेच पाहिजे. काँग्रेसमध्ये सुधारणा करण्याच्या विचारासह हाच पर्याय स्वीकारावा लागणार आहे.संघाचा अजेंडा हा ब्राहमणीकरणाचा अजेंडा आहे, हे भाजप -संघामागे जाणाऱ्या बहुजनांना पटवून देता आले पाहिजे.
निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे म्हणाले, ‘संघाला बेकायदा शस्त्रसाठा उत्सवात बाळगायला आवडते. हा गुन्हा असून मी त्या विरोधात लढत आहे. संघाने असूर शक्तीचा विनाश करायचा निश्चय केला आहे. पण, ‘ असूर ‘ म्हणजे कोण ? हे त्यांना विचारले पाहिजे. चेहरे न बदलता व्यवस्था बदलली पाहिजे.
लेखक संजय सोनवणी म्हणाले, ‘सत्तेनंतर संघ अधिक सांस्कृतिक विध्वंसास प्रोत्साहन देत आहे. स्वतंत्रपणे विचार करण्याची परंपरा नष्ट केली जात आहे. त्यांना हिंदू धर्माला नव्हे तर वैदिक वर्चस्ववादी विचार जपणाऱ्या समूहाला त्यांना जपायचे आहे. भूतकाळाचा खोटा अभिमान बाळगायला लावून ते भविष्याचा वाटा बंद करीत आहेत ‘ .
‘ तीन तलाक म्हणून तलाक् देणाऱ्यांना ३ वर्षाची शिक्षा होते. पण, तलाक न देता पत्नीला न सांभाळणाऱ्याला किती शिक्षा झाली पाहिजे, ‘ असा सवाल मौलाना निझामुदिन यांनी आपल्या भाषणात विचारला. गुलीस्तान उजाडणाऱ्या उल्लूपेक्षा उल्लूचे समर्थन करणाऱ्या पट्ठयांपासून देशाला जास्त धोका आहे,असेही ते म्हणाले
युवा लेखक श्रीरंजन आवटे म्हणाले, ‘ खरे -खोटे बेमालूम मिसळून फसवी वातावरण निर्मिती केली जाते आहे. सामान्यजन त्याला बळी पडत आहेत.मॉब लींचिंग,मतदार यादीतून नावे मोठ्या प्रमाणावर गायब होणे,वाढते एन्काऊंटर, व्यापममधील मृत्यू, पत्रकारांवरील दबाव, लोया यांच्यासारख्या न्यायमूर्तींचे मृत्यू अशा अनेक गोष्टी माध्यमांमध्ये छापून येत नाहीत, चर्चा होत नाही.
‘ ही मतदार जागृती राज्यभर केली जाणार आहे.पक्षीय राजकारणात न जाता , सकारात्मक विरोध करणारे राजकिय व्यासपीठ म्हणून ‘ मतदार जागृती परिषद ‘ हे व्यासपीठ काम करेल,’ असे डॉ. प्रशांत कोठडिया यांनी प्रास्ताविकात सांगितले.
त्रिवेणी प्रशांत, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे या युवकांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला अभिवादन केले. मयूरी शिंदे यांनी उद्देशिकेचे वाचन केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
सभागृहात डॉ. रत्नाकर महाजन, महावीर जोंधळे, अॅड. म.वि. अकोलकर, डॉ. उर्मिला सप्तर्षी ,अन्वर राजन तसेच पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.