अलिबाग दि.३० जून :- कोकणातील चक्रिवादळाच्या तडाख्यात सापडलेले कोकणवासीय अद्यापही सावरले नाहीत. सरकारने नुकसानभरपाईची केलेली घोषणा ही अतिशय तुटपुंजी आहेत. इतक्या दिवसानंतरही येथील चित्र अतिशय विदारक आहे. या ठिकाणचे पंचनामे अजूनही अपूर्ण आहेत. चक्रिवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देतानाचे निकषही चुकीचे असून यामुळे जनतेच्या पैशांच्याच अपव्यय होत आहे. त्यामुळे चक्रिवादळग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्या अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासमवेत रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-रायगड येथे कोरोना नियंत्रणाबाबत व निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी आमदार रविशेठ पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अँड. महेश मोहिते, सीईओ दिलिप हळदे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निसर्ग वादळामुळे झालेले नुकसान साधारणता ७० ते ७५ टक्के इतके आहे.निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या नुकसानीचे काही पंचनामे पूर्ण झाले असून काही अजूनही अपूर्ण आहेत. काही घरांचे केवळ पत्रे उडाले आहेत अशांना देखील दीड लाखांची मदत करण्यात येते. काही नुकसान झाले नाही अशांनी देखील दीड लाख रुपये मिळणार असतील तर हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. म्हणून जनतेच्या पैशांचा अपव्यय होता कामा नये अशी ठाम भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडली.हे राजकीय पार्श्वभूमीतून होतंय का याबाबत चौकशी करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.एका गावात दहा लोकांचा पंचनामा होत असताना बाकीच्या वीस लोकांचा पंचनामा होत नसेल तर यामागे राजकीय पाठबळ आहे का याचीही चौकशी व्हावी अशी मागणी दरेकर यांनी केली.त्याचबरोबर कोकणातील वादळग्रस्तांचे अपूर्ण पंचनामे पूर्ण करा,१५ टक्के ते २५ टक्के नुकसानीला २५ हजार तर ५० टक्के नुकसानीला ५० हजार मदत तात्काळ द्या, जे पंचनामे राजकीय उद्देशाने गावस्तरावर आणि तालुकास्तरावर झाले आहेत त्याची चौकशी करा असे निर्देश दरेकर रायगड रायगड यांनी दिले.
दरेकर म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठ मोठ्या निधीची घोषणा करून कोकणच्या जनेतला खोटी आश्वासनं दिली. तरी येथे राज्य शासनाचा नेमका किती निधी आला,जाहीर केलेला किती निधी वितरित करण्यात आला,वितरणात काही प्रशासकीय अडचणी आहेत का त्याचबरोबर आणखी कशाप्रकारे यांना मदत करत येईल या उद्देशाने आपण रायगड जिल्ह्याचा दौरा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निसर्ग वादळाचा तडाखा बसला त्याच्या दुसऱ्याच दिवशी सर्वप्रथम कोकणला भेट दिली. सरकारचे लक्ष वेधले.माझया दौऱ्यानंतर मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील येथे येऊन पाहणी केली. असे असताना तिसऱ्यांदा इकडे येऊन नेमकं या विषयात काय मदत झाली आहे, पुन्हा काही मदत होईल का याचा आढावा घेतला.तरी कोकणाला मदत करत असताना राज्य शासनाच्या काही त्रुटी असल्यास त्या सरकारला सांगून वेळप्रसंगी कठोर पावले उचलू असा इशारा दरेकर यांनी दिला.
दरेकर म्हणाले, बागायतदारांचे नुकसान झालं त्यासाठी शेतकऱ्यांना ५० हजार इतकी तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केली.तरी प्रत्येक गुंठ्या मागे पाचशे रुपये द्या अशी मागणी केली. या मागणीचा विचार राज्य शासनाने केला नाही याबाबत खंत व्यक्त करताना ते म्हणाले, झाडांसाठी नुकसानभरपाई देत असताना प्रत्येक झाडामागे नुकसानभरपाई द्या अशी मागणी आम्ही केली. याला आदरणीय शरद पवार यांनी देखील दुजोरा दिला. असे असताना ५० हजार हेक्टरी मदतची घोषणा राज्य शासनाने केली ही अत्यंत तुटपुंजी आहे. या मदतीचा कोकणवासीयांना काडीमात्र उपयोग होणार नाही.एक झाड पंधरा ते वीस वर्ष उत्पन्न देतं.इतक्या वर्षाचं पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर ५० हजार इतकी राज्य शासनाची मदत कूचकामी असल्याची टीका दरेकर यांनी केली
कोकणातील बागा उध्वस्त झाल्याने येथील बागायतदार पूर्णपणे हवालदिल झाला आहे. त्याला पुन्हा उभा करण्यासाठी फलोत्पादन करणे आवश्यक आहे. तरी फलोत्पादनासाठी बी-बियाणं , झाड रोप सरकारने मोफत द्यावी. यासाठी कोणतेही पैसे आकारले जाऊ नये. त्याचबरोबर सरकारने कोकणात पाच लिटर रॉकेल देणार असल्याचे सांगितले. परंतु रॉकेलसाठी पैसे आले नसल्याचे सांगून एक ते दोन लिटर दिले जात आहे असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.सरकार ५ लिटर रॉकेल देणार असल्याचे सांगून आता पैसे नसल्याचे कारण देते त्यामुळे सरकार संकटातही गंभीर नसून याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.