विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर यांच्या प्रयत्नांना मिळाले यश
मुंबई दि.२१:- कोरोनाच्या भीतीपोटी मूळचे कोकणवासीय चाकरमानी कोकणच्या दिशेने अनेक अडचणींचा सामना करत निघाले आहेत. पण मुंबई आणि ठाण्यातील जवळपास शेकडो नागरिक राजापूर तालुक्यातील खारेपाटण येथे कुवळेकर वाडीतील उन्हाळे गावात जाण्यासाठी पास नसल्याने अडवण्यात आले होते. यांपैकी काहींकडे चुकीचे पास तर काहींच्या ई-पासची वैध तारीख संपल्यामुळे हे सर्व नागरिक बराच वेळ रस्त्या शेजारी लहान मुलाबाळांसह व वयोवृध्द आजीसह उन्हातान्हात उभे होते. कोकणच्या दौ-यावरुन मुंबईच्या दिशेने परतत असताना हे चित्र दिसल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी विषयाचे गांभीर्य मुंबई व ठाणे येथील संबंधित प्रशासकीय वरिष्ठ अधिका-यांशी संवाद साधून प्रवासात अडकलेल्या कोकणवासीय प्रवाश्यांना तात्काळ पास उपलब्ध करून त्यांच्या गावी कोकणात सुखरूप रवानगी केली आहे. त्यानंतर या कुटुंबियांनी दरेकर यांच्यासह भाजपा आमदारांचे आभार व्यक्त केले.
कोकणवासीयांची गावी जाण्याची व्यवस्था केल्यानंतर श्री.दरेकर म्हणाले, कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर होतो. आज सिंधुदुर्गाचा दौरा उरकून मुंबईकडे रवाना होत होतो. दरम्यान वाटेत उन्हातान्हात उभ्या असलेल्या ८५ वर्षांच्या गावडे आजी दिसल्या.त्यांच्यासह आणखी बरेच प्रवासी असल्याने विचारपूस केली असता पुढच्या प्रवासासाठी लागणाऱ्या परवानगीची अडचण असल्याचे लक्षात आले.यांच्याकडे असणाऱ्या परवानग्या या चुकीच्या होत्या. तरी या आजींना सुखरूप घरी जाता यावे यासाठी मुंबईचे पोलीस उप-आयुक्त प्रणय अशोक यांना विनंती केली.विषयाचं गांभीर्य लक्षात घेत फक्त पंधरा मिनिटांमध्ये त्यांनी परवानगी मिळवून दिली.त्याचबरोबर आणखी काही कुटुंब कालपासून सिंधुदुर्ग या आपल्या गावी जाण्यासाठी धडपड करित असल्याचे समजले. यांमध्ये ठाण्याहून आलेल्या नागरिकांचा समावेश होता. त्यांच्या परवानगीसाठी देखील ठाण्याचे निवासी जिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्याशी संपर्क साधून विनंती केली.त्यांनी देखील तात्काळ परवानगी पाठवली आहे.अशाप्रकारे या दोन कुटूंबांप्रमाणे अडकलेल्या इतर प्रवाश्यांची परवानगी प्राप्त झाली आहे.अशाप्रकारे हे सर्व कुटुंब आपल्या गावातल्या घरी सुखरूप जाणार असल्याचे समाधान श्री.दरेकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भाजपचे आमदार भाई गिरकर , आमदार रमेश पाटील उपस्थित होते.
राज्यात परप्रांतीयांना मोफत एसटी सेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळे सर्व परप्रांतीय आपापल्या गावी पोहचले. परंतु, हा मुंबईचे चाकरमान कोकणवासीय असाच दोन दोन दिवस रस्त्यात अडकून बसत असल्याची खंत श्री.दरेकर यांनी व्यक्त केली. कोकणवासीयांना परवानगी दिली जात नाही किंवा यांची कोणाला चिंता देखील नाही. तरी अडकलेले नागरिक हे आपले भूमिपुत्र आणि स्थानिक आहेत.हे असे रस्त्यात अडकून पडू नये यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी संबंधित परिस्थितीचा आढावा घ्यावा.जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांना आदेश देऊन रीतसर यांना आपल्या गावी आणि आपल्या मातीत जाण्याची व्यवस्था करा अशी विनंती श्री.दरेकर केली.
श्री.दरेकर यांनी सांगितले की, गेले काही तास उन्हातान्हात रस्त्यावर अडलेल्या प्रवाश्यांना परवानगी मिळवण्यासाठी झटलो. अधिकाऱ्यांनी देखील तत्परतेने या विषयात लक्ष घालून परवानगी मिळवून दिल्या.त्यामुळे प्रशासनात वाईटा बरोबर चांगलेही अधिकारी आहेत याचे प्रत्यंतर आले.मुंबईचे उप-पोलीस आयुक्त प्रणय अशोक आणि ठाण्याचे अरडीसी शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून हे शक्य झालं.हीच सुबुद्धी इतर अधिकाऱ्यांना देखील यावी.तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून लोकांचा छळवाद थांबवा अशी विनंती श्री.दरेकर यांनी सरकारला केली.