पालघर, दि. १२ : पर्यटनाच्या दृष्टीने पालघर जिल्ह्याची भौगोलिक रचना अनुकूल असून जिल्ह्याला विस्तीर्ण सागर किनारा लाभला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनस्थळाचा विकास करणे आवश्यक असल्याने पर्यटन विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. ठाकरे बोलत होते.मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, नव्याने जिल्हा अस्तित्वात आल्याने जिल्ह्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा परिषदेच्या इमारतीचे काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. कुपोषण पूर्णपणे थांबविण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधत आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला आहे. जिल्ह्यात विपूल निसर्गसंपदा आहे. हिलस्टेशन आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या दृष्टीकोनातून पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार आहे. आदिवासी संस्कृती व परंपरा जपून समाजाचा विकास करण्यावर शासनाचा भर आहे. जिल्ह्यात दळणवळण, रोजगार, पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.जव्हार तालुक्यातील जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राची आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाहणी केली. प्रवेशद्वारावर असलेल्या फळ्यावर लिहिलेल्या हस्ताक्षराबद्दल श्री. ठाकरे यांनी विचारणा केली. सर्व वैद्यकीय कक्षाची पाहणी झाल्यानंतर विविध रंगात काढलेल्या रांगोळीतील बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र पाहून मुख्यमंत्री श्री. ठाकरे आनंदित झाले. चित्रकार राहुल श्रीराम सहाने या विद्यार्थ्यासोबत आलेले कलाशिक्षक प्रवीण अवतार यांचीही त्यांनी चौकशी केली. पालघर जिल्ह्यातील वारली चित्रकला अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यातील चित्रांना संकल्पना देऊन विविध रंगात रंगविण्यात यावी यासाठी मुलांचे लहान गट करण्यात यावेत तसेच ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. रांगोळी कला ही चित्रकलेपेक्षा कठीण असून त्यात खूप मेहनत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी, महिला अर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, खासदार राजेंद्र गावित सर्वश्री आमदार श्रीनिवास वानगा, सुनिल भुसारा, रवींद्र फाटक, कोकण विभागाचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरिक्षक. संजय मोहिते जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, वसई विरार महानगर पालिका आयुक्त डी. गंगाथरण, सहायक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, पी. नायर तसेच जिल्ह्यातील अधिकारी व नागरिक उपस्थित होते.