पुणे-दिल्लीतील आप सरकर विरोधात अण्णा हजारे यांना आंदोलनासाठी बोलाविणाऱ्या भाजपच्या दिल्ली अध्यक्ष असलेल्या आदेश गुप्ता आणि एकूणच भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना अण्णा हजारे यांनी एका पत्रा द्वारे चांगलेच झापले आहे.
सद्य परिस्थितीत मला वाटत नाही की देशातील कोणताही पक्ष देशाला उज्ज्वल भविष्य देण्यास सक्षम आहे. आज अनेक पक्ष-पार्टी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रात गुंतलेले आहेत. कोणताही पक्ष किंवा पार्टी सत्तेत असली तरी व्यवस्था बदलल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, लोकांना दिलासा मिळणार नाही. म्हणून मी दिल्लीत येऊन काही फरक पडणार नाही. अशी माझी धारणा आहे.देशात बदल फक्त पक्ष बदलून नव्हे तर व्यवस्था बदलून होईल.सिर्फ हंगामा खडा हो यह हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश है यही की सुरत बदलनी चाहीए। असा शेवट असलेले हे पत्र आम्ही आमच्या वाचक दर्शक यांच्या साठी येथे जसेच्या तसे देत आहोत ..अण्णांच्या शब्दात ..वाचा जसेच्या तसे …..
दिनांक – 28/08/2020जा.क्र.06/2020-21/मराठी
प्रति,
मा. आदेश गुप्ता,
अध्यक्ष भारतीय जनता पार्टी,
दिल्ली क्षेत्र
महोदय,
24 ऑगस्ट रोजी आपण लिहिलेले पत्र प्रसारमाध्यमांद्वारे मला प्राप्त झाले. आपण पत्रात लिहिले आहे की तुम्ही दिल्लीत येऊन ‘आप’ पक्षाविरूद्ध लोकपाल चळवळीसारखे आंदोलन करून आवाज उठविला पाहिजे आणि आम्हाला सहकार्य करावे.
प्रेसला लिहिलेले तुमचे पत्र वाचून मला वाईट वाटले. तुमची भारतीय जनता पार्टी मागील सहा वर्षाहून अधिक काळ देशात सत्तेत आहे. युवा शक्ती ही राष्ट्रीय शक्ती आहे. तुमच्या पार्टीमध्ये तरुणांची संख्या मोठी असून जगातील सर्वाधिक पार्टी सदस्य असल्याचा दावा करणारे नेते, मंदिरात १० बाय १२ फूट खोलीत राहणाऱ्या 83 वर्षीय अण्णा हजारे यांच्यासारखे, ज्यांच्याकडे पैसा नाही, संपत्ती नाही, सत्ता नाही अशा माणसाला दिल्लीत आंदोलन करण्यासाठी बोलावत आहे, यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते.
आज केंद्रात आपल्या पार्टीचे सरकार आहे. दिल्ली सरकारचे अनेक विषयही केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. सीबीआय, आर्थिक अपराध, व्हिजनस, दिल्ली सरकारचे पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. पंतप्रधान नेहमीच असा दावा करतात की केंद्र सरकारने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर पावले उचलली आहेत. जर अशीच परिस्थिती असेल आणि जर दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला असेल तर आपले सरकार त्यांच्याविरूद्ध कठोर कायदेशीर कारवाई का करीत नाही? की भ्रष्टाचार निर्मूलनाचे केंद्र सरकारचे सर्व दावे निरर्थक आहेत?
वयाच्या 83 व्या वर्षी मी समाज, राज्य आणि देशाच्या हितासाठी २२ वर्षांपासून अहिंसेच्या मार्गाने आंदोलने केले आहेत. 20 वेळा उपोषण केले आहे. आजपर्यंतच्या आंदोलनामुळे सहा मंत्र्यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागले. सत्तेवरून पायउतार झालेल्या मंत्र्यांमध्ये विविध पक्षाचे मंत्री आहेत. मी कोणताही पक्ष किंवा पार्टी पाहून आंदोलने केलेली नाहीत. मला कोणत्याही पक्ष आणि पार्टीचे घेणेदेणे नाही. फक्त गाव, समाज आणि देशाच्या भल्यासाठीच मी आंदोलन करीत आलेलो आहे.
सत्तेत असलेल्या ज्या पार्टीच्या विरोधात माझे आंदोलन झाले त्या पार्टीने नेहमी माझे नाव दुसऱ्या पक्ष-पार्टी बरोबर जोडले आहे. रेडीमेड कपड्यांचे दुकान असते. त्या दुकानातील कपडे कुणाच्या शरीराचे माप घेऊन शिवलेले नसतात. परंतु ते रेडीमेड कपडे कुणाच्या ना कुणाच्या शरीराला फिट येतात. ज्यांच्या शरीराला ते रेडीमेड कपडे फिट येतात त्यांना वाटते हे आमच्यासाठीच शिवलेले आहेत. आज अनेक पक्ष-पार्ट्यांचे असेच झालेले आहे. आमच्या आंदोलनामुळे ज्या पक्ष-पार्टीचे नुकसान झाले आहे तो पक्ष-पार्टी मी दुसऱ्या पक्ष-पार्टीचा हस्तक आहे अशी अफवा व गैरसमज समाजामध्ये पसरवित असतो. आजपर्यंत अनेक वेळाला माझी नींदा करण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु अण्णा हजारे ला काही फरक पडत नाही. मी आजही तोच अण्णा हजारे आहे.
वाढत्या भ्रष्टाचारामुळे २०११ चे दिल्ली आंदोलन झाले. लोकांना आपले जीवन जगणे कठीण झाले होते. भ्रष्टाचारामुळे जनता अस्वस्थ झाली होती. अशा परिस्थितीत अण्णा हजारे यांच्यासारखा व्यक्ती आपल्यासाठी आंदोलन करत आहेत असा विचार करून दिल्ली आणि देशातील लोक रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर 2014 मध्ये भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखवून तुमचे सरकार सत्तेत आले. परंतु जनतेच्या समस्या काही कमी झाल्या नाहीत. एका पक्ष-पार्टीला नेहमी दुसऱ्या पक्ष-पार्टीचा दोष दिसतो. कधीकधी एखाद्या पक्ष-पार्टीने स्वत: आत्मपरिक्षण करून स्वतःच्या दोषांविरूद्ध बोलले पाहिजे.
सद्य परिस्थितीत मला वाटत नाही की देशातील कोणताही पक्ष देशाला उज्ज्वल भविष्य देण्यास सक्षम आहे. आज अनेक पक्ष-पार्टी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रात गुंतलेले आहेत. कोणताही पक्ष किंवा पार्टी सत्तेत असली तरी व्यवस्था बदलल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, लोकांना दिलासा मिळणार नाही. म्हणून मी दिल्लीत येऊन काही फरक पडणार नाही. अशी माझी धारणा आहे.
देशात बदल फक्त पक्ष बदलून नव्हे तर व्यवस्था बदलून होईल.
सिर्फ हंगामा खडा हो यह हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश है यही की सुरत बदलनी चाहीए।
आपला,
कि. बा. तथा अण्णा हजारे