नागपूर : महिला सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. सायबर गुन्ह्यांमध्ये महिलांना बलत्काराच्या धमक्या देण्यात येत आहेत. त्यांना सोशल माध्यमांवरून ट्रोलिंग करण्यात येत आहे. अशा गुन्ह्यांबाबत कठोर पावले उचला. ट्रोलिंग करणाऱ्याचे खाते खरे असो की बनावट, अशांना हुडकून काढा आणि सळाखींमागे पोहोचवा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलेत. विधिमंडळाच्या सभागृहात सायबर गुन्हे विषयक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, सायबर सेलचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह, विशेष पोलिस निरीक्षक कनकरत्नम प्रसन्न, सायबरचे पोलिस अधीक्षक बालसिंग राजपूत, उपसचिव आनंद हेडावडेकर, गृह विभागाचे अवर सचिव तुषार महाजन, सहसचिव घोडाखेकर, मुंबई सायबर सेलचे विशाल गायकवाड, महाराष्ट्र सायबर सेलचे उपअधीक्षक विजय कुमार, श्रीकांत कलगुटकर, नागपूर पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे अवर सचिव दिलीप देशमुख, टिकटॉकने नॅशनल नोडल अधिकारी अनुज भाटिया, पोलिस उपायुक्त आर. जी. दाभाडे, पत्रकार रश्मी पुराणिक, प्रसन्न जकाते. शीतल करदेकर, ममता खांडेकर, प्रियदर्शनी हिंगे, रवींद्र खेबुडकर, उपस्थित होते.
ब्रिजेश सिंह यांनी राज्यातील सायबर गुन्ह्यांच्या सद्य:स्थितीची माहिती उपस्थिताना दिली. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईंची संख्या त्यांनी नमूद केली. बैठकीत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सोशल माध्यमांवरून एखाद्या महिलेला, मुलीला धमकी येत असेल तर पोलिसांनी तिच्या तक्रारीची प्रतीक्षा करू नये. स्वत:हुन कारवाई करावी. वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलिस विभागाच्या ट्विटर आणि फेसबुक हॅण्डलला टॅग करण्याऐवजी पीडित महिलांना थेट महाराष्ट्र पोलिस महासंचालकांच्या ट्विटर हॅण्डला टॅग करून तक्रारी कराव्या. सर्व पोलिस दलाने महासंचालकांच्या ट्विटर हॅण्डलवर लक्ष ठेवावे व त्यानुसार पुढील कारवाई करावी. धमकी देणाऱ्याचे सोशल खाते खरे असो किंवा बनावट त्याला हुडकून काढाच, असे निर्देश त्यांनी दिलेत. टिकटॉक आणि इतर सोशल साइट्सनी आपापल्यास्तरावर संवेदनशील संदेश, व्हिडीओ याबद्दल दक्षता बाळगावी व पोलिसांना सहकार्य करावे, असे त्या म्हणाल्या.
पीडित महिलेपर्यंत जाताना पोलिसांनी साध्या वेशात जाण्याच प्रयत्न करावा. त्यामुळे तक्रारकर्त्या महिलेची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलिस दलासह सायबर विभागाचे मनुष्यबळ वाढविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. सायबर गुन्हे शोधून काढण्यासाठी राज्यातील पोलिस दलाला व्यापक यंत्र सामग्री मिळाली आहे. त्याचा परिपूर्ण वापर करावा. सध्या राज्यात ४७ सायबर पोलिस ठाणी आहेत. त्याची संख्या कशी वाढविता येईल, यावरही भर द्यावा, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.