मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानातील लोकांचे अगदी तोंडभरून कौतुक केले आहे. “मी पाकिस्तानात गेलो तेव्हा माझे चांगले स्वागत तर झालेच. शिवाय या लोकांनी खूप प्रेम दिले’, अशा शब्दांत पवारांनी तेथील लोकांची प्रशंसा केली. मोदी सरकार राजकीय लाभासाठी पाकिस्तानची वाईट प्रतिमा लोकांसमोर मांडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पाकमधील जनतेचे सर्वच आघाड्यांवर हाल होत असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात ही स्थिती नाही, असा दावा पवार यांनी केला. पाकिस्तानातील लोक आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भलेही भारतात येऊ शकत नसतील. परंतु, भारतातून तेथे गेलेल्या प्रत्येकालाच ते आपला पाहुणा मानतात, असेही ते म्हणाले. पवार यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने टीका केली. पवार यांच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत. यामुळे त्यांना नैराश्य आले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.