गडचिरोली – येथील जांभूरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य करून हल्ला केला. या हल्ल्यात किमान 15 जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नक्षलविरोधी विशेष पथकाचे हे जवान एका खासगी वाहनातून जात होते. जांभूरखेडा येथे त्यांचे वाहन पोहोचताच मोठा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस आणि निमलष्करी दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सोबतच, परिसरात नक्षल्यांना पकडण्यासाठी कोंबिंग ऑपरेशनची तयारी केली जात आहे. या हल्ल्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी नक्षलवाद्यांनी 36 वाहनांना आग लावली होती.
वाहनांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या
सुरुवातीला गृह राज्यमंत्र्यांनी हे जवान सीआरपीएफचे असल्याचा दावा केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते सी-60 जवान असल्याचे ट्वीटच्या माध्यमातून स्पष्ट केले. घटनास्थळावरून आलेल्या छायाचित्रांवरून स्फोटाची तीव्रता जाणवते. ज्या वाहनात जवान नेले जात होते त्या वाहनाचे केवळ तुकडे सापडले आहेत. याच दिशेने सी-60 जवानांना खासगी वाहनातून नेले जात होते. त्यानुसारच, नक्षलवाद्यांनी भूसुरुंग पेरून घात लावून हा हल्ला केला. उल्लेखनीय बाब म्हणजे, गडचिरोलीच्या या भागात नक्षलवाद्यांनी लोकांना मतदान करू नका असे धमकावले होते. त्यानंतरही स्थानिकांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला. मोठ्या संख्येने लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचाच राग काढून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला असे सांगितले जात आहे.
या हल्ल्यानंतर एएनआय शी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहा काय म्हटले आहे.
रेणुका शहाणेंची संतप्त प्रतिक्रिया-
गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले. या घटनेने पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीसुद्धा घटनेचा निषेध केला आहे.
‘निषेध! या नक्षलवाद्यांचा निषेध, या भ्याड हल्ल्याचा निषेध! ज्या सुरक्षाकर्मींचे प्राण गेले त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली. एकीकडे आतंकवाद तर दुसरीकडे नक्षलवाद, आपल्या सुरक्षाकर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा संताप व्यक्त केला आहे.
मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १५ जवान शहीद झाले असून खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे.