-१५ वे विद्रोही साहित्य संमेलन २५ व २६ मार्च
-डाॅ. आनंद पाटील आहेत विद्रोही संमेलनाचे अध्यक्ष-उद् घाटनास ग्रेटा थनबर्गला निमंत्रण देणार
मुंबई-यंदा ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन नाशिकमध्ये आमनेसामने होणार आहेत. दोन्ही भिन्न प्रवाहाच्या व विचारधारेच्या साहित्य संमेलनाच्या तारखासुद्धा २५ ते २८ मार्च दरम्यान अगदी समान आल्या आहेत. त्यामुळे साहित्य रसिकांना मोठी पर्वणी लाभणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी विद्रोही साहित्य संमेलनाची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये विद्रोहीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी १५ व्या संमेलनाची घोषणा केली. २५ आणि २६ मार्च रोजी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या केटीएमएच महाविद्यालयाच्या आवारात संमेलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समीक्षक डॉ. आनंद पाटील (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे. पाटील आघाडीचे सांस्कृतिक तुलनाकार व इतिहासकार आहेत. ते निर्भीड मांडणी आणि आंतरविद्याशाखीय व्यासंगामुळे ओळखले जातात. ‘कागूद आणि सावली’ या त्यांच्या दोन लघु कांदबऱ्या गाजल्या आहेत. गोवा विद्यापीठ, नवी दिल्ली विद्यापीठ, उत्तर गुजरात विद्यापीठात ते प्राध्यापक होते. त्यांची २४ पेक्षा अधिक ग्रंथ प्रकाशित असल्याचे विद्रोहीचे राज्य संघटक काॅ. किशोर ढमाले यांनी सांगितले.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाला राज्य सरकार देत असलेले ५० लाखाचे अनुदान रद्द करावे, अशी मागणी विद्रोही संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशी उन्हवणे यांनी केली. विद्रोही संमेलन मूठभर धान्य आणि एक रुपया अशी वर्गणी घेऊन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाचे सर्व नियम पाळून संमेलन घेणार असल्याचे विद्रोहीचे विश्वस्त गणेशभाई उन्हवणे म्हणाले. दिल्लीत चालु असलेले शेतकरी आंदोलन आणि केंद्रातल्या मोदी सरकारकडुन अभिव्यक्तीची होत असलेली गळचेपीच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे होत असलेल्या १५ विद्रोही साहित्य संमेनाचे खास औचित्य असल्याचे राजू देसले म्हणाले.
आजपर्यंत बाबुराव बागुल, आ. ह साळुंखे, वाहरु सोनवणे, उर्मिला पवार, तारा रेड्टी, संजय पवार, जयंत पवार, तुळशी परब, आत्माराम कनिराम राठोड, अजिज नदाफ विद्रोहीचे संमेलनाचे अध्यक्ष राहिले आहेत.
संमेनलाच्या उद् घाटनास आतंरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेट थनबर्ग हिस निमंत्रण देण्यात येणार असल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने सांगण्यात आले.