मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) – सध्याला राज्यामध्ये सत्तास्थापनेचे वेध लागले असून राज्यातलं प्रमुख सत्ताकेंद्र हे शिवसेनापक्षप्रमुखांचे निवासस्थान मातोश्री बनले आहे. मातोश्री व वर्षावर दररोज नवनवीन घडामोडी होत असतानाच मातोश्रीवर शिवसेना आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भाजपाकडून कमिटमेंट पाळताना शब्द फिरवण्याचा अनुभव सांगून सत्ता वाटपाचा फॉर्म्युला भाजपकडून लेखी घेण्यासंदर्भात विनंती केली.
याच पार्श्वभूमीवर किसानक्रांतीचे संदीप गिड्डे यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना दिलेले संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी भाजपची मानसिकता तयार करणे गरजेचे असून संपूर्ण कर्जमुक्ती चे वचन पूर्ण करण्यासाठी सत्तावाटपासोबत भाजपकडून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची कमिटमेंट देखील घ्यावी अशी विनंती केली. संपूर्ण कर्जमाफी संदर्भात भाजप तितकासा उत्सुक दिसत नाही मात्र निवडणुकीदरम्यान शिवसेनेने सर्वत्र संपूर्ण कर्जमाफी चे कर्ज मुक्ती चे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. संदीप गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीपूर्वी किसानक्रांती व राष्ट्रीय किसान महासंघाशी निगडित असणाऱ्या अनेक समन्वयकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. यावेळी शिवसेना शेतकरी कर्जमाफी, हमीभाव व पीक विम्याच्या बाबतीमध्ये नेहमीच शेतकऱ्यांच्या बरोबर राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी वचन दिले होते. त्यानंतर प्रचारात देखील संदीप गिड्डे व सहकाऱ्यांनी जवळजवळ तीस मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवारांचा प्रचार करीत असताना संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या सोबत राहण्याचे विविध माध्यमातून आवाहन केले आहे. आत्ताच्या महायुतीसोबत सरकार स्थापन करत असताना या कर्जमाफीला भाजपने साथ न दिल्यास हे आश्वासन फुसका बार ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सत्तावाटप करण्या या पूर्वीच भाजपकडून कर्जमाफीची कमिटमेंट घ्यावी अशी विनंती संदीप गिड्डे यांनी केल्याचे समजते. यावर शिवसेना काय भूमिका घेते व भाजपा त्यास कसा प्रतिसाद देते हा येणाऱ्या काळातील औत्सुक्याचा विषय राहील.