मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटी आपल्या सर्व जिल्हा, तालुका, युनिट कमिट्यांना तसेच सर्व कार्यकर्त्यांना आणि तमाम विद्यार्थी वर्गाला २३ नोव्हेंबर २०१९ रोजी रस्त्यावर उतरून जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रती एकता दर्शविण्याचे आवाहन करत आहे. कारण जेएनयू विद्यार्थ्यांनी सुरू केलेला संघर्ष हा केवळ त्यांच्यापर्यंत किंवा दिल्लीपर्यंत मर्यादित राहिला नाही. देशातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्था वाचविण्याची मागणी करणारे जेएनयू विद्यार्थ्यांचे आंदोलन आता भारतातील तमाम विद्यार्थी वर्गाचे आंदोलन बनले आहे.
१८ नोव्हेंबर रोजी जेएनयू विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. मागील आठवड्यात अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषदेच्या कार्यालयासमोर जबरदस्त आंदोलन होऊनही प्रशासनाने मागण्या सोडवल्या नाहीत. म्हणून पुन्हा १८ नोव्हेंबर रोजी जेएनयूमधील शुल्क वाढ रद्द करा व सार्वजनिक शिक्षण वाचविण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे संसद भवनावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. जेएनयूमधील विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी सतत संघर्ष करत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून शुल्क वाढ रद्द करण्याची मागणी घेऊन सतत आंदोलन चालवित आहेत. विद्यापीठ परिसर, दिल्ली येथील अ.भा.तंत्रज्ञान शिक्षण परिषद, संसद भवनावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. हे सर्व आंदोलन लोकशाही मार्गाने झाले. १८ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेला मोर्चा लोकशाही मार्गाने संसद भवनावर जात असताना पोलिसांनी अडवून अत्यंत अमानुषपणे लाठीचार्ज केला. एक-एक विद्यार्थी पोलिसांनी बाजूला घेतला आणि क्रुरपणे त्यांना मारहाण केली. हे अत्यंत निंदनीय आहे. पोलिसांचा आणि सीआरपीएफ जवानांचा वापर करून मोर्चावर लाठीहल्ला केला. यामध्ये अनेकांना गंभीर जखमा झाल्या. तसेच अनेकांना अटक करण्यात आले. या पोलिसी लाठीहल्ल्याचा होईल तितका निषेध कमीच असेल. काही दिवसांपूर्वी जेएनयूच्या कुलगुरूंनी वसतिगृह आणि इतर प्रकारच्या शुल्कात वाढ केली. ही शुल्क वाढ रद्द करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी सातत्याने जेएनयू प्रशासनाकडे केली. त्यासाठी विद्यापीठ परिसरात सर्व विद्यार्थ्यांनी मोठी रॅली काढून मोर्चा आयोजित केला होता. सतत साखळी स्वरूपाचे आंदोलन चालवले गेले. तरीदेखील जेएनयूचे कुलगुरू आणि त्यांच्या प्रशासनाने यावर कसलाच तोडगा काढला नाही. त्यांनंतर विद्यार्थ्यांना अ.भा.तंत्रज्ञान शिक्षण परिषदेच्या कार्यालयावर धडक मारावी लागली. त्यातूनही काहीच हाती लागले नाही. त्यानंतर संसद भवनावर मोर्चा निघाला. या मोर्चाला चिरडून टाकण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न करून झाले. लाठीहल्ला होऊन सुद्धा जेएनयू विद्यार्थ्यांच्या मोर्चाने माघार घेतली नाही. तिथेच ठिय्या मांडून आंदोलन सुरू ठेवले. लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी सरकारने पोलिसी बळाचा वापर करून आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करणे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. जेएनयू विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या दडपशाहीचा एसएफआय जाहीर निषेध करते.
तसेच २३ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा दिल्लीतील जेएनयू सोबत डीयू, आंबेडकर, जामिया मिलिया आदी विद्यापीठातील विद्यार्थी एकत्र येऊन मंडी हाऊस ते संसद भवन असा मोर्चा काढणार आहेत. या आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, सार्वजनिक शिक्षण वाचविण्यासाठी तमाम विद्यार्थी वर्गाने या आंदोलनाप्रती एकता दर्शवण्यासाठी, दडपशाहीचा निषेध करण्यासाठी त्याच दिवशी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी मोठ्या प्रमाणात राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटीने करत आहे.