मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्या तत्वतः मान्य केल्याचे सांगितले असताना देखील अद्याप कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे मागण्या मान्य होण्यासाठी समस्त ब्राह्मण समाजाने पुन्हा एकदा कंबर कसली असून आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नागपूर येथील संविधान चौकात 03 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून यात एकूण 80 संघटनांनी एकत्र असल्याची माहिती आमच्या सूत्रांकडून मिळालेली आहे.
समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र च्या वतीने नागपूर येथे सर्व संघटना प्रतिनिधींची बैठक आयोजीत करण्यात आली होती. ब्राह्मण समाजाच्या वतीने दि. 22 जानेवारी 2019 रोजी मुंबई येथे आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्या तत्वतः मान्य केल्याचे सांगितले होते. परंतु, आजतागायत या मागण्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. ब्राह्मण समाजाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ, पुरोहितांना मानधन, महापुरुषांच्या बदनामी विरोधी कायदा, वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करण्यासाठी कायदा, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार, श्री दादोजी कोंडदेव व श्री राम गणेश गडकरी यांचे पुतळे पुन्हा सन्मानाने प्रस्थापित करणे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे श्रीवर्धन येथील स्मारकाचे काम पूर्ण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करणे, शनिवार वाडा येथे श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या 44 लढायांचे युद्ध स्मारक निर्माण करणे या सर्व मागण्या मान्य होण्यासाठी समस्त ब्राह्मण समाजाने पुन्हा एकदा कंबर कसली असून आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नागपूर येथील संविधान चौकात 03 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे या आंदोलनात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समन्वय समिती च्या वतीने विश्वजीत देशपांडे, सौ. अर्चना देशमुख, मनीष द्विवेदी, रामनारायण मिश्रा आदींनी केले असल्याचे कळत आहे.
ब्राह्मण समाजाच्या मागण्यांबाबत 04 निवेदनाद्वारे राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांनी काय काय योजना केला आहेत त्याचे अभ्यास पूर्ण असे त्याच धर्तीवर 130 पानांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी दिले आहे. तसेच एकूण 13 ब्राह्मण समाजाचे आमदार असून त्यापैकी 04 आमदारांची बैठक मुंबई मध्ये आमदार मनीषा कायंदे, सुधीर गाडगीळ, संजय केळकर, राज पुरोहित यांच्या सहित झाली होती. अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.