मुंबई 16 जून : राज्यात अपारंपारिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली .या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, दिनेश वाघमारे, प्रधान सचिव (ऊर्जा),सुभाष डुंबरे, महासंचालक महाऊर्जा व इतर संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कोळशावर आधारीत वीज उत्पादनाऐवजी सौर वा तत्सम स्वरुपाच्या अपारंपारिक उर्जेला प्राधान्य देण्यात यावे यांसाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली व अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
राज्यात सहवीज निर्मितीचे 2000 मेगावाट क्षमतेचे प्रकल्प असून त्यात आणखी सुमारे 1000 मेगावाट भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून पवन वगळता अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील अन्य ऊर्जा क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
राज्यात पारंपरिक कृषिपंप जोडणीचे हजारो अर्ज प्रलंबित असून शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करून दिलासा देण्यात येणार आहे. यामुळे कृषीपंपाच्या वीज जोडणीचे प्रलंबित अर्ज निकाली काढता येणार आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अनुदान अनुसूचित जाती-जमाती , विजा/भज,इमाव, मराठा इत्यादी कंपोनंट मधून करण्यात येणार आहे.
पारेषण विरहित सौर ऊर्जेवर आधारित शेती पूरक (व्यक्तीगत लाभार्थी) विविध योजनांचा या धोरणात समावेश करण्यात आला असूनशहरी घनकचऱ्या पासून वीज निर्मिती व बायो सीएनजी प्रकल्पांचा विकास यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.—————————–