मालमत्ता वसुली कासवगतीने सुरु
पुणे :धनकवडी येथील गुरुकृपा मार्केटिंग पासून घोटाळे सुरु केलेल्या आणि मीडियामध्ये उच्च स्थानी दाखल झालेल्या तथाकथित घोटाळेबहाद्दर महेश मोतेवार च्या ‘समृद्ध जीवन फूडस इंडिया’ कंपनीने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषणने (सीआयडी) गेल्या ५ वर्षांपासून फरार असलेल्या दोघा संचालकांना अटक केली आहे.दरम्यान मोतेवार याच्या आणखी छुप्या साथीदारांचा शोध सीआयडी घेते आहे .
ऋषीकेश वसंत कणसे (वय ३०) आणि सुप्रिया वसंत कणसे (वय ३६, रा. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या कंपनीने ३ हजार ७०० कोटी रुपयांची फसवणुक केली आहे. त्यांना गुरुवारी विशेष न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने अधिक तपासासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे तपासात या कंपन्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे गैर बँकिंग कंपन्या म्हणून नोंदणीकृत नसल्याचे व कंपनीला ठेवी जमा करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सीआयडीकडे तपासाला असलेल्या ४ ही गुन्ह्यात दोषारोपपत्र यापूर्वीच न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम वाळके, निरीक्षक शैलजा बोबडे, वनिता धुमाळ, हवालदार बाजीराव कुंजीर, प्रशांत पवार, राहुल कदम, निनाद माने, भूषण पवार व कविता नाईक यांनी ही कामगिरी केली.
३ हजार ७०० कोटींची फसवणूक
समृद्ध जीवन फूडस इंडिया या महेश मोतेवार यांच्या कंपनीने देशभरातील विविध राज्यांमध्ये कमिशन एजंट नेमून त्यांच्याकडून गुंतवणुकदार/ ठेवीदारांना अधिक व्याजाचे अमिष दाखवून कोट्यावधींच्या ठेवी स्वीकारल्या व कोणतीही रक्कम परत न करता अंदाजे ३ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा अपहार केला आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत २३३ कोटी ३३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून आरोपीकडून इतर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे.