मुंबई – देशात मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ झाली आहे. वास्तविक पाहता, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमीच आहेत. मात्र केंद्र सरकारने लावलेल्या अवाच्या सव्वा करांमुळे पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केली. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खोचक सवाल केला आहे.
देशात पेट्रोलचे दर वाढून ११० रुपये प्रति लिटर झाले आहे. डिझेलही शंभरी गाठत आहे. सीएनजी आणि एलपीजीचे भाव वाढत आहेत. जगात क्रूड ऑईलच्या तुलनेत देशातील इंधनाची दरवाढ नाही. युपीएचे सरकार असताना भाजपचे नेते सांगायचे की, आम्हाला सत्ता द्या आम्ही इंधनदर कमी करु. “बहुत हुई मंहगाई की मार, अब की बार मोदी सरकार”. पेट्रोल दरवाढीचे भांडवल करुन मोदी सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्यावेळी जागतिक स्तरावर क्रूड ऑईलचे दर कोसळल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले. त्यामुळे मोदी साहेब दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात म्हणत होते की, “मेरे नसीबसे दाम कम हो रहे है”, असं बोलणारे मोदीजी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या नशीबाने की जनतेच्या नशीबाने? कोण कमनशीबी आहे? देशातील जनता की तुम्ही? याचे उत्तर मोदींनी द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.