पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरीश बापट यांच्या मृत्यूविषयी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, गिरीश बापट हे नम्र आणि कष्टाळू नेते होते. त्यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेषत: पुण्याच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांप्रती संवेदना. ओम शांती. अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी ट्वीट करून त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.
माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले.ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.
गिरिष बापटांसारखा नेता, असा खासदार पुनः होणे नाही : डॉ. नीलम गोऱ्हे
दीर्घ काळापासून पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची पुण्याचा आवाज म्हणून ओळख होती ते पुण्याचे खासदार श्री. गिरिष बापट यांचे आज नुकतेच निधन झाल्याचे समजले. त्यांना सर्व प्रथम मी महाराष्ट्र विधान परिषदेची उप सभापती, शिवसेनेची उपनेता तथा स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.
त्यांचा आणि माझ्या गेल्या तीन दशकांपासून अधिक काळ परिचय होता. पुणे शहरातून कसबा विधान सभेतून आमदार म्हणून काम करीत असताना त्यांचा परिचय आमच्या कुटुंबात आमची आई कै. श्रीमती लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्याशी सर्वप्रथम झाला.
त्यानंतर शिवसेना-भाजप युतीचे सरकार असतानाही सातत्याने संपर्कात असत.
२०१४ नंतर ते पुण्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे खासदार देखील झाले. या संपूर्ण कालावधीत त्यांनी पुणेकरांच्या असंख्य प्रश्न सोडवितानाच अष्टविनायक, पुणे शहरातील वाडे, संसदीय कार्यमंत्री असताना दोन्ही सभागृहांचा समन्वय त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केला होते. ते मंत्री असतांना विधान परिषदेत नेहमीच येत होते. सर्व पक्षांच्या आमदारांचे एक चांगले स्नेही म्हणून ते परिचित होते.
स्त्री आधार केंद्राच्या कार्यक्रमाना देखील अनेकदा ते आले होते. महात्मा फुले संग्रहालयाच्या ठिकाणाहून त्यांचा सर्वांचा संपर्क होत असे. असा नेता, असा खासदार पुनः होणे नाही अशी भावना मी व्यक्त करीत आहे.