सातारा दि.२३ : विद्यापीठ चालवणे हे आव्हान असले तरी आमची बलस्थाने म्हणजे ए प्लस दर्जाची कॉलेजेस असून ती स्वायत आहेत.रयत शिक्षण संस्था ही नामांकित शिक्षण संस्था आहे. या विद्यापीठाचा कुलाधिकारी म्हणून काम करण्याची मोठी संधी मला मिळाली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे ग्रामीण भागातील अतिशय चांगल्या उपलब्धी असलेले विद्यापीठ आहे. विकासाच्या वाटेवर घेऊन जाणे ही आपली जबाबदारी आहे. शिक्षणाचा दर्जा उच्चतर राहील याच्यासाठी जे जे करावे लागेल ते आपण करू.प्रयोग करण्यासाठी आपल्याला आता खूप स्वातंत्र्य मिळाले आहे. तुलनात्मक दृष्ट्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू ‘’असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त प्रथम कुलाधिकारी चंद्रकात दळवी यांनी दिले. आज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा कार्यभार घेण्यासाठी ते आले होते त्यावेळी विद्यापीठाने यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आयोजित केलेल्या स्वागत समारंभात ते बोलत होते.
आपल्या भाषणात रयत शिक्षण संस्थेचा संदर्भ देताना ते म्हणाले ,रयतचे हायस्कूल आमच्या गावात नसते तर मी या पदावर नसतो. कर्मवीरांच्या नावाने असलेल्या विद्यापिठाचा कुलाधिकारी होणे हे माझ्यासाठी खूप संस्मरणीय व भाग्यशाली असा दिवस आहे. मी हनुमान विद्यालय निढळ येथे शिकलो.आहे ग्रामीण जीवन मी अनुभवले आहे.हे पद म्हणजे एक नैतिक जबाबदारी आहे. विद्यापीठातील सर्व प्राध्यापक हे सारथी आहेत. मी वेळच्या वेळी निर्णय घेऊन कामे पूर्ण करीन अशी ग्वाही त्यांनी दिली. कुलगुरू प्रा.डी.टी.शिर्के यांच्या ज्ञानाचा फायदा घेऊन आपण विद्यापीठाचे काम गतिमान करू असेही यावेळी त्यांनी सांगितले.