पुणे- राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याचे, आणि परदेशात केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधानभवनात उमटले. राहुल गांधींनी माफी मागावी, अशी जोरदार घोषणाबाजी भाजप आणि शिंदे गटाने केली. त्यामुळे विधानभवनात चांगलाच गदारोळ झाला. शेवटी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित केले.त्यानंतर पुन्हा सभा सुरु झाली असता पुन्हा याच कारणावरून गोंधळ झाला आणि अद्याक्षांनी ३० मिनिटे कामकाज सभा तहकूब केली .
यावेळी आमदार संजय शिरसाट म्हणाले की, “या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पाडलं होतं. ही तीच काँग्रेस आहे. आमच्या काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांनी आणि काँग्रेस आमदारांनी सांगावं की, राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याला तुमचा पाठिंबा आहे का? सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्याबद्दलचं असं वक्तव्य आम्ही ऐकून घेणार नाही. या काँग्रेसने दहशतवादी अजमल कसाबचा उदो उदो केला, त्याला बिर्याणी चारली. त्यांचा राहुल गांधींच्या वक्तव्याला पाठिंबा असेल तर त्याने आम्हाला काही फरक पडत नाही.
विधानसभेतील प्रश्नोत्तराचा तास संपताच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सभागृहात राहुल गांधी यांच्या सावरकरांसंबंधीच्या कथित अवमानकारक विधानाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, ‘आम्ही लहानपणापासूनच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या शौर्याचे धडे वाचले. पण काँग्रेसचे तथाकथीत नेते राहुल गांधी वारंवार त्यांचा अवमान करत आहेत. भारत जोडो यात्रेतही त्यांनी त्यांच्याविरोधात अपशब्द वापरले. आम्ही हा अवमान सहन करणार नाही. त्यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो.’
भाजप नेते आशिष शेलार यांनीही यावेळी राहुल गांधींच्या माफीची मागणी केली. ते म्हणाले – ‘राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताचा अवमान केला. तसेच भारतीय स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या सावरकरांचाही अवमान केला. त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे.’ शेलार यांनी यावेळी सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहात राहुल गांधींविरोधात जोरदार नारेबाजी केली.