हरिद्वार-योगगुरू स्वामी रामदेव यांनी पाकिस्तानच्या सद्यस्थितीवर वक्तव्य करताना म्हटले की, लवकरच पाकिस्तानचे तुकडे होणार आहेत. लवकरच बलुचिस्तान पीओके आणि सिंध प्रदेश भारतात विलीन होईल आणि पाकिस्तान स्वतंत्र देश म्हणून राहील.
हरिद्वारमधील पतंजली योगपीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना मार्गदर्शन करताना योगगुरू रामदेव म्हणाले की, जागतिक राजकारणात खूप काही सुरू आहे. युक्रेन व रशियात युद्ध सुरू आहे. चीन व पाककडून भारतविरोधी कुरापती सुरू आहेत. तालिबान्यांनाही आता अफगाणिस्तान सांभाळता येणार नाही. त्यामुळे पाकचे 3 भाग भारतात विलीन होताच अखंड भारताचे स्वप्न साकार होईल.
सद्यस्थितीत सनातन धर्मावरील हल्ल्यांत वाढ झाली आहे. रामायण, भगतद् गीता, वेद व उपनिषदांना कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय कट कारस्थानांतर्गत केले जात आहे. आम्ही सनातन धर्माविरोधात सुरू असणारा प्रोपगेंडा कदापी सहन करणार नाही, असे रामदेव म्हणाले.
सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी देशात धार्मिक दहशतवाद सुरू आहे. त्यात कधी सनातन धर्म, तर कधी आपल्या महापुरुषांचे चारित्र्य हनन केले जात आहे. असे करणारे देशविरोधी आहेत. हे सर्वकाही परकीय शक्तींच्या इशाऱ्यानुसार होत आहे, असे रामदेव म्हणाले.