मुंबई-अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण यातील अनिल जयसिंघानीला गुजरातमधून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात अनिल याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीअटकेत आहे.अनिल जयसिंघानीला घेऊन पोलिस मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.अनिल जयसिंघानी यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस अनिल जयसिंघानी यांचा शोध सुरु होता.अनिल जयसिंघानी याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना तब्बल 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला. अमृता फडणवीस यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर 2021 साली पहिल्यांदा भेट झाली होती. अनिक्षाने सांगितले की, ती कपडे दागिन्यांची डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेले कपडे आणि दागिने सार्वजनिक कार्यक्रमात घालावे अशी विनंती केली होती.त्यानंतर 27 जानेवारी 2023 रोजी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अनिक्षा भेटली. कार्यक्रम झाल्यावर अनिक्षाला कारमध्ये बसवले. तेव्हा बोलताना अनिक्षाने म्हटले की, तिचे वडील पोलिसांना बुकींबाबत माहिती देत होते. त्यानुसार, पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसे कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो. असे फडणवीस यांनी तक्रारीत म्हटले आहे.अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात मे 2019 मध्ये लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. क्रिकेट बेटिंगप्रकरणात अनिल जयसिंघानी यांना अनेकदा अटक करण्यात आलेली आहे.
या प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आरोपींनी मुंबईच्या एका जुन्या पोलिस आयुक्तांचे नाव घेतले. अनेक मोठ्या लोकांची नावे घेतली. तो व्यक्ती सापडल्यास हा कट उघड होईल. पोलिसांनी छापेमारी केली आहे. कारवाई सुरू केली आहे. मला वाटते की, जुन्या सरकारकडून जे प्रयत्न सुरू होते. त्यात एक नवा प्रयत्न समोर आला आहे.अनिल जयसिंघानी हा मूळचा ठाण्यातील उल्हासनगर येथील. एकेकाळी देशातील सर्वात मोठ्या बुकीमध्ये अनिल जयसिंघानीचे नाव होते. त्याचे सर्वात प्रथम नाव समोर आले ते 2010 मध्ये. ठाण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बेट घेताना पोलिसांनी त्याला प्रथम अटक केली होती. नंतर या क्षेत्रात त्याचे वजन वाढत गेले. मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयातही त्याचे वजन होते, अशी चर्चा आहे. ईडीच्या गुजरात युनिटने 2015 च्या सुरुवातीला त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केल्यानंतर तो देश सोडून पळून गेला, असेही बोलले गेले. अनिल जयसिंघानीविरोधात महाराष्ट्र, आसाम, गोवा, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये 15 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. बहुतेक प्रकरणे हे सट्टेबाजाशी संबंधित आहे.
अनिल जयसिंघानी याचा उद्धव ठाकरेंसोबत फोटो ट्विट करुन भाजप नेते मोहीत कंबोज यांनी या दोघांच्या संबंधांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सुषमा अंधारे यांनीही पलटवार करत एकनाथ शिंदेंनीच अनिल जयसिंघानीला मातोश्रीत आणले, असा आरोप केला होता. सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या की, जयसिंघानी हा उल्हासनगरमध्ये राहातो. जेव्हा त्याने शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे हे होते. ‘मातोश्री’त जिल्हाप्रमुखांशिवाय प्रवेश मिळत नाही. जयजयसिंघानी यांना ‘मातोश्री’वर कोणी आणले?. तसेच, ठाण्यातील श्रीकांत शिंदेंचे कार्यालय हे जयसिंघानीच्याच जागेवर असल्याचा गंभीर आरोपही सुषमा अंधारेंनी केला. अनिल जयसिंघानी हा मुळात सर्व पक्षातून फिरून आला आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांशी त्याचे संबंध असल्याच्या चर्चा आहेत.
2010 मध्ये अनिल जयसिंघानी याच्याविरोधात सट्टेबाजीचे अनेक गुन्हे दाखल असतानाही त्याला पोलिस संरक्षण देण्यात आले होते. तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून सरकारच्या या निर्णयावर टीका केली होती. त्यानंतर पोलिसांनी जयसिंघानीचे पोलिस संरक्षण काढून घेतले होते.
त्यानंतर 2015 च्या क्रिकेट विश्वचषकापूर्वीही बुकी असलेल्या अनिल जयसिंघानीला पुन्हा पोलिस संरक्षण देण्यात आले. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. विरोधकांनी ही बाब लक्षात आणून देताच फडणवीसांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याचे पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले होते. नंतर गुजरात ईडीने सिंघानियाविरोधात मनी लाँड्रींगचा तपास सुरू केल्यानंतर तो फरार झाला होता.
बुकी म्हणून अनिल जयसिंघानी कुख्यात असूनही त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी ही थेट देवेंद्र फडणीसांच्या बंगल्यात अनेकदा गेली, हे समोर आल्यानंतर विरोधकांनीही देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस आपले घरच सुरक्षित ठेवू शकत नसेल राज्य काय सुरक्षित ठेवणार?, असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंसह सुषमा अंधारेंनी केला आहे. तसेच, विरोधक हे अमृता फडणवीस आणि अनिक्षा जयसिंघानी यांची मैत्री कसे काय घडवून आणू शकतात?, असाही सवाल विरोधकांनी केला आहे.
अनिक्षाविरोधात दाखल तक्रारीमध्ये अमृता फडणवीसांनी म्हटले आहे की, नोव्हेंबर 2021 मध्ये आपण डिझायनर असल्याचे सांगत अनिक्षाने आपल्याशी जवळीक साधली. आपण आई गमावली आहे आणि आपल्यावरच कुटुंबाची जबाबदारी असल्याचे सांगत अनिक्षाने अमृता फडणवीसांना तिने डिझाईन केलेले कपडे घालायला लावले. त्यानंतर अनिक्षाने बंगल्याला अनेकदा भेट दिली. त्यानंतर आपल्या वडीलाविरोधातील गुन्हे मागे घ्यावेत, अशी विनंती अनिक्षाने अमृता फडणवीसांना केली. ही विनंती फेटाळल्यानंतर एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केला व लाच प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला.