मुंबई- जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला अत्यंत चुकीचा होता. या घटनेबद्दल मी क्षमायाचना करतो. क्षमा मागतो, अशा शब्दांत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेद व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज पार पाडली. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजेदेखील उपस्थित होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, जालन्यात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी होती. अशा प्रकारे बळाच्या वापराचे समर्थन करता येऊ शकत नाही. मी यापूर्वीही राज्याचा गृहमंत्री राहिलो आहे. युती सरकारमध्ये मी गृहमंत्री असताना राज्यात 2 हजार आंदोलन झाले. परंतू कधीची बळाचा वापर झाला नाही.
शासनाच्या वतीने क्षमा मागतो
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आतादेखील जालन्यात आंदोलकांवर लाठीहल्ला करण्याचे काहीही कारण नव्हते. पण, जी काही घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होती. हल्ल्यात निष्पाप नागरिक जखमी झाले. त्यांच्या प्रती शासनाच्या वतीने याठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जालन्यातील घटनेची उच्च चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सरकार दोषींवर नक्कीच कारवाई करेल. दरम्यान, या घटनेवरून काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत दुर्दैवी होते. काही तर म्हणाले, लाठीहल्ल्याचा आदेश मंत्रालयातून दिला गेला. अशा प्रकारचे नॅरेटीव्ह सेट करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, लाठीहल्ला करण्याचे अधिकार हे एसपी, डीवायएसपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांनाच असतात. त्यामध्ये मंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नसते.