मुंबई, दि. 30 :- मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टीबीएम यंत्राने पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतूक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वपूर्ण अशी भर पडल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील स्वराज्यभूमी-गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानचा बोगदा खणण्याचा अखेरचा टप्पा- ब्रेक थ्रू मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आला. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, एल ॲण्ड टी कंपनी तसेच या प्रकल्पातील सल्लागार कंपन्यांचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रियदर्शनी पार्क येथे टीबीएम यंत्राने खोदाईचा हा अखेरचा टप्पा पूर्ण करून बोगदा पूर्ण करताच, या ठिकाणी काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला.
या किनारा रस्ता प्रकल्पाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचे यापूर्वीच जाहीर केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, एमटीएचएल हा समुद्री सेतूही आता पूर्ण होतो आहे. हा मार्ग पुढे वरळीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम महामार्गावरील ताण कमी होणार आहे. मेट्रोचे विविध मार्ग, उड्डाणपूल यांचे काम पूर्ण होण्यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील हा बोगदा खोदाईचा टप्पा पूर्ण होणे एक महत्त्वाचा टप्पा आहे. या क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष सहकार्य केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे हे देखील या प्रकल्पाच्या कामावर सातत्याने लक्ष ठेवून होते. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल. तो जनतेसाठी खुला होईल, असे प्रयत्न आहेत. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतूक सुविधेत एक महत्त्वाची भर पडणार आहे. हे आव्हानात्मक काम पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पासाठी झटणाऱ्या सर्वांचेच कौतुक करावे लागेल.
मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाविषयी…
- बोगदा खणणाऱ्या यंत्राने (TBM) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा (व्यास १२.१९ मी.) बोगदा आहे.
- प्रकल्पातील बोगद्याला ३७५ मि.मी. जाड काँक्रिट अस्तर. त्यावर अग्निप्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत फायरबोर्डची व्यवस्था. यामध्ये भारतात प्रथमच सकार्डो वायूविजन प्रणालीची व्यवस्था.
- दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीची व्यवस्था. भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) बांधून पुलांची उभारणी.
- प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतू वरळी टोकापर्यंतच्या या एकाच प्रकल्पामध्ये रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती.
- पर्यावरणपूरक पद्धतीनं काम. प्रवाळ (Coral)स्थलांतर व अस्तित्व टिकविण्याची कार्यवाही यशस्वी.
- या सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे ७० टक्के वेळेची बचत, ३४ टक्के इंधन बचत. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणात बचत.
- ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत. अतिरिक्त जवळजवळ ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होऊन पर्यायाने मुंबईकरांचे जीवनमान सुधारण्यास मदत. सुरक्षित, जलद, कमी खर्चात प्रवास
- या प्रकल्पात हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक (Cycle tracks), सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, (Jogging tracks), खुले प्रेक्षागृह (Open Theatre) इत्यादी समाविष्ट
- हाजीअली व महालक्ष्मी मंदिर या दोन्ही ठिकाणी वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध
- प्रकल्पाचा अंदाजित खर्च रु. १२ हजार ७२१/-कोटी (बांधकाम खर्च रु. ८४२९/- कोटी).
- रस्त्याची लांबी – १०.५८ कि.मी. मार्गिका संख्या – ८ (४+४), (बोगद्यांमध्ये ३+३)