इस्लामाबाद-पाक रेंजर्सनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्ट परिसरात अटक करून फरपटत नेले. त्यांच्या अटकेनंतर पाकिस्तानी जनता रस्त्यावर उतरली. सायंकाळपर्यंत इम्रान समर्थकांनी लाहोरपासून ते थेट रावळपिंडीच्या लष्करी मुख्यालयावर कब्जा करण्यासाठी हल्ला चढवला.माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार सुरूच आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे समर्थक पेशावर, इस्लामाबादसह अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि तोडफोड करत आहेत. आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. रात्री उशिरा रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. लाहोरमधील गव्हर्नर हाऊस जाळण्यात आले. कराचीच्या कँट परिसरात हल्ला झाला.
- पीटीआय समर्थकांनी रात्री उशिरा लाहोरमधील लष्कर कमांडरच्या घराला आग लावली. आणखी अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ले झाले.
- हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज देशभरातील खासगी शाळा बंद राहणार आहेत.
- राजधानी इस्लामाबाद आणि पंजाब प्रांतात दोन दिवस कलम 144 लागू करण्यात आले आहे. पेशावरमध्ये 30 दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे.
- इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे पीटीआय नेते फवाद चौधरी यांनी म्हटले आहे.
- क्वेट्टा येथे आंदोलनादरम्यान पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पीटीआय नेते कासिम सूरी यांनी केला आहे.
- इस्लामाबाद पोलिसांनी सांगितले की, 5 अधिकारी जखमी झाले आहेत, तर 43 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लष्कराविरुद्ध प्रथमच एवढा संताप दिसून आला आहे. लष्करी वाहनांवर महिलांनी दगडफेक केली. रात्री उशिरापर्यंत सुमारे डझनभर शहरांमध्ये उग्र निदर्शने करीत इम्रान समर्थकांनी लष्कर आणि सरकारविरुद्ध युद्धच पुकारले. इकडे, पंतप्रधान शाहबाज शरीफ लंडनमध्ये तर लष्करप्रमुख आसिम मुनीर ओमानमध्ये आहेत.
अल कादिर विद्यापीठ घोटाळा प्रकरणी लष्कराने मंगळवारी इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केली. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, इम्रान पुढील ४-५ दिवस तपास यंत्रणा एनएबीच्या ताब्यात राहतील.. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. इम्रान दोन प्रकरणात जामिनासाठी उच्च न्यायालयात पोहोचले होते, जिथे पाकिस्तान रेंजर्सने त्यांना अटक केली
पाकमध्ये मार्शल लॉची परिस्थिती, लष्कराच्या अस्तित्वाला धोका
इम्रान यांच्या अटकेनंतर लष्कराविरुद्ध जनता रस्त्यावर उतरली आहे. लष्कराला याची कल्पना नव्हती. त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानातील परिस्थिती पाहता लवकरच मार्शल लॉ लागू झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. आपल्या लोकप्रियतेच्या बळावर लष्कराचा मुकाबला करणारे आणि लष्कराचा अहंकार मोडून काढणारे पहिलेच राजकीय नेते आहेत. यापूर्वी लियाकत अली आणि बेनझीर भुत्तो यांनी लष्कारास अाव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दोघांचाही खूपच दु:खद शेवट झाला. भारताविरोधात एकही युद्ध जिंकू न शकलेले पाकिस्तानी लष्कर आपल्याही भल्याचे नाही, हे जनतेला कळून चुकले आहे. लोकशाहीच्या मार्गात सर्वात मोठी अडचण लष्करच आहे. जनतेच्या याच भावनेचा फायदा इम्रान खान करून घेत अाहेत.
अटकेपूर्वी इम्रान आणि लष्करामध्ये झाला वाद
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये माझ्यावर झालेल्या हल्ल्यात आयएसआयचे मेजर-जनरल फैसल नासिर यांचा हात होता, असा आरोप इम्रान यांनी ६ मे रोजी एका रॅलीत केला होता. ८ मे रोजी लष्कराने इम्रान यांनी बिनुडाचे आरोप करू नये, असे बजावले होते. इम्रान यांनी मंगळवारी कोर्टात जात असतानाही लष्कराविरुद्ध वक्तव्ये केली होती.
मियांवालीत लष्कराच्या एअरबेसमध्ये घुसले लोक
– पेशावरमध्ये रेडिओ पाकिस्तानच्या इमारतीला आग लावण्यात आली.
– पाकिस्तानात सोशल मीडियावर बंदी. अनेक ठिकाणी मोबाइल इंटरनेटही बंद करण्यात आले आहे.
– इम्रान समर्थक आंदोलकांनी खैबर पख्तूनख्वा विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वाराला आग लावली.
– इम्रान यांच्या अटकेविरुद्ध पीटीआयच्या याचिकेवर हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला.
– इम्रान यांना सध्या रावळपिंडीत एनएबी मुख्यालयात ठेवले.
– भारताने अांतरराष्ट्रीय सीमा व एलओसीवर हाय अलर्ट जारी केला.
आर्मी कमांडरच्या घरावर हल्ला
- इम्रानच्या अटकेनंतर लाहोरमधील लष्करी कमांडरच्या घरावर खान यांच्या पक्षाच्या पीटीआय कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू फोडून काही ऐवज लंपास केला. नंतर त्यांच्या घराला आग लावण्यात आली. इतर अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या घरांवरही हल्ले झाले आहेत.
- पेशावर आणि कराचीसह देशभरातील अनेक शहरांमध्ये पोलिस आणि पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये हिंसक चकमकी झाल्या आहेत. काही लोक मारले गेल्याची नोंद आहे, परंतु याची पुष्टी झालेली नाही.
- इम्रानच्या पक्ष पीटीआयचे नेते मुसरत चीमा यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले – खान यांचा छळ केला जात आहे. ते खान साहबांना मारत आहेत. इम्रानच्या वकिलाचा व्हिडिओही पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
सरन्यायाधीशांनी विचारले – कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली?
- इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी गृह सचिव आणि इस्लामाबाद पोलीस प्रमुखांना अटक केल्यानंतर १५ मिनिटांत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती फारुख म्हणाले- पोलीस प्रमुख न्यायालयात हजर झाले नाहीत तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना येथे बोलावले जाईल. या लोकांनी कोर्टात येऊन सांगावे की इम्रान यांना कोणत्या प्रकरणात आणि का अटक करण्यात आली? मात्र, रात्री 11 वाजता न्यायमूर्ती फारुख म्हणाले – अटक योग्य आहे, परंतु पद्धत चुकीची आहे.
- अल कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रानला अटक करण्यात आली आहे. ही विद्यापीठाशी संबंधित बाब आहे. पंतप्रधान असताना इम्रान यांनी या विद्यापीठासाठी कोट्यवधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे संपादित केली. पाकिस्तानचे सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व मलिक रियाझ यांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. इम्रानने ही जमीन मलिक रियाझकडूनच घेतली होती.
- अटकेचा धाक दाखवून इम्रान आणि त्याची पत्नी बुशरा बीबी यांनी कोट्यवधी रुपयांची जमीन आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप रिझे यांनी केला होता. त्यानंतर रियाझ आणि त्याची मुलगी यांच्यातील संभाषणाचा एक ऑडिओ लीक झाला होता. यामध्ये रियाजच्या मुलीचे म्हणणे आहे की, बुशरा बीबी त्याच्याकडे सतत पाच कॅरेटची हिऱ्याची अंगठी मागत आहे.
- विशेष बाब म्हणजे अल कादिर विद्यापीठात केवळ तीन विश्वस्त आहेत. इम्रान, बुशरा आणि बुशराची मैत्रीण फराह गोगी. या विद्यापीठात केवळ 32 विद्यार्थी आहेत. खान यांच्यावर एकूण 108 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 4 अशा आहेत, ज्यात त्याची अटक निश्चित आहे. यामुळेच खान यापैकी कोणत्याही प्रकरणात कोर्टात हजर राहत नाहीत.