लखनऊ-लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेच्या सातव्या दिवशी अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या मुलाने पोलिसांसमोर सरेंडर केले. अजय मिश्र यांचा मुलगा आशीष मागच्या दाराने तोंड लपवून क्राइम ब्रांचच्या कार्यालयात हजर झाला. त्याला 11 वाजता बोलावण्यात आले होते. परंतु, 10.36 वाजताच तो मागच्या दाराने आत गेला. पोलिसांनी गर्दी टाळण्यासाठी कार्यालयाबाहेर बॅरिकेड लावले आहेत.
पोलिस उप महानिरीक्षक एसपी विजय ढुल या ठिकाणी उपस्थित होते. अटक होणार की नाही यावर प्रश्न केला असता कुणीही स्पष्ट उत्तर दिलेले नाही. आशीष सोबत आणखी कोण आले हे सुद्धा जाहीर झालेले नाही. मंत्री अजय मिश्रा सुद्धा सकाळीच आपल्या कार्यालयात पोहोचले. त्या ठिकाणी सुद्धा धावपळ सुरू आहे.
आशीषला पोलिसांसमोर हजर होण्यासाठी शुक्रवारी दुसऱ्यांदा त्याच्या घरावर नोटीस चिटकवण्यात आली होती. त्याला शनिवारी सकाळी 11 वाजता हजर होण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी गुरुवारी त्याच्या घराबाहेर नोटीस चिटकवून शुक्रवारी सकाळी 10 वाजता हजर होण्यास सांगितले होते. परंतु, आजारपणाचे कारण देत 9 तारखेला हजर होणार अशी माहिती समोर आली होती.
तर दुसरीकडे पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपले मौन वृत सोडले आहे. सिद्धूंनी शुक्रवारी लखीमपूर गाठले होते. त्यावेळी शेतकरी लवप्रीत आणि पत्रकार रमन यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. हे दोघेही लखीमपूरच्या घटनेत मारले गेले होते. यातील आरोपी मंत्रीपुत्राला अटक होत नाही तोपर्यंत आपण मौनवृत धारण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.