मुंबई दि. 19 : गडचिरोली जिल्ह्यातील आनोरा उपविभागातील कोसमी किसनेली जंगल परिसरात रविवार दि.18 ऑक्टोबर रोजी पाच नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केला. याबद्दल त्या विभागातील वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाईंनी स्वत: दूरध्वनी करुन शाबासकी देत त्यांचे अभिनंदन करुन त्यांचे कौतुक केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आनोरा उपविभागातील कोसमी किसनेली जंगल परिसरात रविवारी सायं. 4.30 वाजता या विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया यांच्या नेतृत्वाखाली सी-60 चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी या अभियानातील पोलिसांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल सी- 60 चे जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला आणि या गोळीबारात पाच नक्षलवादी ठार झाले.
महाराष्ट्र पोलिस यंत्रणेतील गडचिरोली विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या धाडसी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी गडचिरोली विभागातील पोलिस यंत्रणेची ही बातमी समजताच गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील,गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल तसेच या धाडसी कारवाईत सहभागी झालेले अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया यांना स्वत: फोन केला व त्यांचे विशेष अभिनंदन करुन या कारवाईत सहभागी झालेले सर्व पोलिस कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचा एक फोन पोलिस यंत्रणेचे मनोबल वाढविणारापाच नक्षलवाद्याचा गडचिरोलीत खात्मा करण्यात आला हे समजताच गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाईंनी आम्हाला तसेच येथील नक्षलग्रस्त भागात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करुन केलेले कौतुक हे पोलिस यंत्रणेचे मनोबल वाढविणारे आहे अशी प्रतिक्रिया गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.