पणजी, 13 नोव्हेंबर 2021
शारीरिक आरोग्याएवढेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. विशेषतः कोविडनंतरच्या परिस्थितीत हे प्रकर्षाने जाणवत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन तसेच बंदर, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सांत इनेज येथे मानसिक आरोग्याविषयी समुपदेशन आणि उपचार करणाऱ्या ‘उक्ती फाऊंडेशन’चे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उक्ती फाऊंडेशनची राज्यातील ही पहिली शाखा आहे.राज्यात मानसिक आरोग्याविषयीच्या सर्वांगीण संस्थेची आवश्यकता यानिमित्ताने पूर्ण होईल, असे नाईक म्हणाले. कोविड महामारीनंतर मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. शारीरिक आजार दिसून येतात, तसेच त्यावर उपचाराची सुविधा आहे. मात्र, मानसिक आरोग्य हे सुप्तावस्थेत असून त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि उपचाराची आवश्यकता असते. मानसिक आरोग्याचा कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागतो. अशाप्रकारच्या संस्थांच्या माध्यमातून नागरीक मानसिक आरोग्याविषयी अधिकाधिक जागृत होतील, अशी आशा श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली.केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने अशा संस्थांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. उक्ती संस्थेत मानसोपचार शिक्षणाचे अभ्यासक्रमही चालवले जातात.