नवी दिल्ली- देशातील महागाई आणि जीएसटी व बेरोजगारी विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेसतर्फे आज देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवास्थानाला घेराव घालणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधीं, प्रियांका गांधीसह पक्षाचे अनेक नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला होता. मात्र हा मोर्चा पोलिसांनी रोखला आहे.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात
सर्वप्रथम सोनियांसह काँग्रेसच्या खासदारांनी संसदेत काळे कपडे घालून घोषणाबाजी केली. त्यानंतर राहुल संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्यासाठी निघाले, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले आणि ताब्यात घेतले.पक्षाच्या मुख्यालयात उपस्थित असलेल्या प्रियंका गांधी यांनी पुढाकार घेतला आणि त्या आपल्या खासदारांसह पंतप्रधान निवासाला घेराव घालण्यासाठी बाहेर पडल्या, परंतु येथेही पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे त्या रस्त्यावरच धरणे देऊ लागल्या. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी अजय माकन, सचिन पायलट, हरीश रावत, अविनाश पांडे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले.
काळे कपडे घालून केंद्र सरकारचा निषेध
आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे घातल केंद्र सरकारविरोधात निषेध नोंदवला आहे. जनतेचे प्रश्न मांडणे हे आमचं काम आहे. मात्र, पोलिसांकडून काँग्रेस काही खासदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना मारहाणही करण्यात आला असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत काढलेला मोर्चा पोलिसांनी रोखत त्यांना ताब्यात घेतलं आहे.
अकबर रोडवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात
अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयाबाहेर सुमारे 300 मीटर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. शुक्रवारी कोणत्याही कामगाराला आत प्रवेश दिला जात नाही.
राज्यांत राजभवनावर मोर्चे
काँग्रेसने निदर्शनांप्रकरणी राज्यांतही रणनीती तयार केली आहे. पक्षाचे नेते राजभवनापर्यंत मार्च काढून राज्यपालांना निवेदन सुपूर्द करतील. निदर्शनांवर नजर ठेवण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पक्षाने ब्लॉक-जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांनाही मुख्यालयाबाहेर निदर्शने करुन अटक करवून घेण्याचे निर्देश दिलेत.
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
1. प्रत्येक संस्थेत RSSचा माणूस : देशातील माध्यमे, निवडणूक व्यवस्थेच्या आधारे विरोधी पक्ष उभा राहतो, पण देशातील प्रत्येक संस्थेत RSSचा माणूस बसलेला असतो. तो सरकारच्या ताब्यात आहे. आमचे सरकार असताना पायाभूत सुविधा तटस्थ होत्या. आम्ही त्यात हस्तक्षेप केला नाही. आज ते सरकारकडे आहे. कोणी विरोध केला तर केंद्रीय तपास यंत्रणांना त्याच्या विरोधात उभे केले जाते.
2. आठ वर्षांत लोकशाही उद्ध्वस्त : लोकशाहीचा जो मृत्यू झाला आहे, त्यावर तुम्हाला काय वाटते? ज्या लोकशाहीला 70 वर्षांत उभारले होते, ती आठ वर्षांत नष्ट करण्यात आली.
3. मी जेवढे खरे बोलेन, तेवढे हल्ले : माझी अडचण ही आहे की मी खरे बोलेन, मी महागाई, बेरोजगारीचा मुद्दा मांडण्याचे काम करेन. जो घाबरतो तो धमकावतो. आज देशाची जी स्थिती आहे, त्याला घाबरतात. त्यांनी पूर्ण केली नाहीत, ते महागाई आणि बेरोजगारीला घाबरत आहेत. ते जनतेच्या शक्तीला घाबरतात, कारण ते 24 तास खोटे बोलतात.