मुंबई. महाराष्ट्रासह देशभरातील लॉकडाउनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपुष्टात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा लॉकडाउन वाढणार असल्याचे मंगळवारीच स्पष्ट केले. परंतु, हा लॉकडाउन आधीपेक्षा वेगळा राहील असे देखील सांगण्यात आले. तरीही कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील हॉटस्पॉटमध्ये असलेल्या यात दिलासा मिळणार नाही. कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनवर घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवण्यावर विचार करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थांंशी संवाद साधताना राज्यातील लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढणार असे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची गुरुवारी बैठक घेण्यात आली. यामध्ये 17 मे नंतरचे लॉकडाउन आणि निर्बंध कसे असतील त्यावर चर्चा करण्यात आली. यातच “मुंबई आणि उपनगरांमध्ये, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, मालेगाव आणि नाशिकमध्ये 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार आपले मत केंद्र सरकारला लेखी स्वरुपात कळवणार आहे.” उल्लेखनीय बाब म्हणजे, मोदींनी जनतेशी मंगळवारी संवाद साधला. त्याच्या 24 तासांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत 6 तास व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी मोदींना लॉकडाउन आणखी वाढवणे आणि निर्बंध कमी करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी साधलेल्या संवादानंतर त्या सर्वांची मते मागवण्यात आली होती. सर्वच राज्यातील परिस्थिती आणि राज्य सरकारांची मते जाणून घेतल्यानंतर केंद्र सरकार चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनवर गाइडलाइन जारी करणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, जल संपदा मंत्री जयंत पाटील, शहरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते.