मुंबई. महाराष्ट्रातील लॉकडाउन 14 एप्रिलनंतरही असाच लागू राहणार असल्याची घोषणा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हा लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. हा लॉकडाउन कसा राहील, परीक्षा आणि उद्योगांसह छोट्या व्यापारांचे काय याचा तपशील 14 एप्रिलनंतर जारी केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यानंतर उठलेल्या शंका आणि चर्चांना विराम लावण्यासाठी मुख्यमंत्री जनतेसमोर आले. सोशल मीडियावरून लाइव्ह संवाद साधताना त्यांनी सर्व अफवा थांबवत हा लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढत असल्याचे जाहीर केले.
महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कोणत्याही उलटसुलट बातम्या येण्याऐवजी मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. आजपर्यंत जे धैर्य दाखवलंत तसंच यापुढेही दाखवा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. सगळ्यांनी शिस्त पाळली, धीरोदात्तपणा दाखवला आहे त्याचं कौतुक आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे हे तर खरं आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचं प्रवेशद्वार आहे. आपण तपासण्या सुरु केल्या तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतल्या देशांना बंदी होती. मात्र जे देश यादीत नव्हते त्यातले रुग्ण मिसळले. आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग सील केले आहेत. जे रुग्ण आपल्याला सापडलेत त्याची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करते आहे. आता समोरुन रुग्ण येण्याची वाट बघत नाही, तर घरी जाऊन चाचण्या करतो आहोत. मुंबईत संख्या १ हजारांवर गेली आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र ही आपल्याला फक्त कमी करायची नाही तर शून्यावर आणायची आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
राज्यातील चाचणी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सुमारे ३३ हजार चाचण्या घेण्यात आल्या असून १५७४ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत तर ३० हजार ४७७ जणांचे निगेटिव्ह आहेत. १८८ रुग्ण बरे करून घरी पाठवले आहेत.
दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला आहे ती संख्या वाढते आहे. ज्यांचं वय जास्त आहे त्यांचा धोका वाढतो आहे. ज्यांना आधीपासून काही विकार आहेत अशा रुग्णांवर करोनाचा गंभीर परिणाम होतो आहे. आकाश पांघरुनी जग हे शांत झोपलेले हे गाणं आठवतं आहे. आकाश तर पांघरलं आहे पण झोप उडाली आहे सगळ्यांची अशी अवस्था आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तुम्हाला वाटेल की परिस्थिती गंभीर असताना मला गाणं कसं सुचतं ? पण आज मला या गाण्याच्या ओळी आठवत आहेत असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितलं.
‘किमान’ जोर देऊन बोलतोय, किमान 30 एप्रिलयपर्यंत राहणार लॉकडाउन -सीएम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, राज्यातील एकूणच परिस्थिती पाहता हा लॉकडाउन 30 एप्रिल पर्यंत लागू राहणार आहे. लक्षात ठेवा, किमान हा शब्द मी मुद्दाम जोर देऊन बोलतोय. याचा अर्थ 30 एप्रिल पर्यंत सर्वच नागरिकांनी आप-आपली जबाबदारी लक्षात घेऊन लॉकडाउनचे पालन केले. परिस्थिती नियंत्रणात आली तरच यानंतर लॉकडाउन मागे घेण्याचा विचार केला जाईल. अन्यथा हा लॉकडाउन 30 एप्रलिनंतर सुद्धा वाढवण्याचा निर्णय घेतला जाउ शकतो.
अत्यावश्यक सेवा अशाच सुरू राहतील…
मुख्यमंत्री नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले- राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उलट सुलट बातम्या येण्यापेक्षा आपणंच खरं काय ते सांगावं याउद्देशाने मी तुमच्यासमोर आलो आहे. आपण संचारबंदीपासून सुरुवात केली आणि लॉकडाउनपर्यंत आलो. आपण समोरून रुग्ण येण्याची वाट पाहत नाहीत तर घरी जाऊन लोकांची तपासणी करतो आहोत. मुंबई जेथे रुग्ण सापडले तो भाग आपण सील केला. 60 पेक्षा अधिक वय आणि आधीपासून मधुमेह, किडनी विकार अशा रोगग्रस्तांनाच कोरोनाचा धोका आहे. हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल झाले होते. महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवला जात असला तरीही यात अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरूच राहतील अशी खात्री मुख्यमंत्र्यांनी करून दिली आहे.