मुंबई–अदानी इलेक्ट्रिसिटी या खासगी कंपनीला वीजपुरवठ्यासाठी परवाना देऊ नये तसेच महावितरणच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपामुळे ठिकठिकाणी फटका बसत आहे. सध्या कोयना धरण क्षेत्रातली वीज निर्मिती बंद झाली असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. दुसरीकडे संप करणाऱ्या कामगारांना राज्य सरकारने नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर मेस्मांतर्गत कारवाई करू असा इशारा दिला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपातून तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली आहे.
महावितरण, महाजनको आणि महापारेषषणमधील खासगीकरणाला विरोध म्हणत कर्मचाऱ्यांनी बुधवार मध्यरात्रीपासून तीन दिवस संप पुकारला आहे. महावितरण वीज कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या मुंबई उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी या खासगी कंपनीला वीजपुरवठ्यासाठी परवाना देऊ नये तसेच महाजनको व महापारेषणमधील खासगीकरणाला विरोध केला आहे.
वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कोयना धरण क्षेत्रातल्या पायथा वीजगृहात होणारी 40 मेगावॅट वीज निर्मिती बंद झाली आहे. वीज निर्मिती पावर हाऊस मधील 36 मेगावॅटचे दोन युनिट बंद झाले आहेत. येथे वीजनिर्मितीसाठी वापरलेले प्रति सेकंद तब्बल 2100 क्यूसेक्स पाणी नंतर सिंचनासाठी सोडले जात होते. त्या पाण्याचा पुरवठाही बंद झाला आहे. मात्र, शेतीसाठी गरज असेल, तर धरणातून आज दुपारी पाणी सोडले जाऊ शकते.
वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात 31 संघटनांचे दीड लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत (मेस्मा) कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज बैठक बोलावली आहे. यात तोडगा निघणार का, याची उत्सुकता कायम आहे.
सध्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्याला संपाचा फटका बसला आहे. नागपूरमधील उमरेड, भिवापूर पंचक्रोशी मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे या भागातला वीजपुरवठा बंद झाल्याचे समजते. दुसरीकडे वीज कर्मचारी संपावर असल्याने हा पुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत.
वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा बीड जिल्ह्यातल्या परळी येथे फटका बसला आहे. या ठिकाणी जीओ कंपनीचे मोबाइल बंद पडल्याचे समजते. जीओच्या नेटसेवेवर परिणाम झाला आहे. नेट बंद असेल, तर या कंपनीचे फोन बंद पडतात. त्यामुळे अनेकांचे मोबाइल बंद पडल्याचे समजते.
वीज संपामुळे लातूर जिल्ह्यातल्या अनेक गावातला वीजपुरवठा खंडित झाला आहे. लातूर, निलंगा, उदगीर, औराद शहाजनी, अहमदपूर या भागातला वीजपुरवठा बंद पडला आहे. हा वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, कर्मचारी संपामुळे असल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत.