मुंबई – तमाशा रंगमंचावर पहिल्या स्त्री कलाकार म्हणून तमाशाच्या इतिहासात नाव अजरामर केलेल्या सौंदर्य कलावती पवळा हिवरकर यांच्या नावाने राज्य सांस्कृतिक पुरस्कारांतर्गत देण्यात येणाऱ्या “तमाशा” ह्या लोककला क्षेत्रातील पुरस्कार सुरू करावा अशी जोरदार मागणी सांस्कृतिक कार्य विभागाकडे करण्यात आली असून .याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख हे सकारात्मक असल्याचे कळते.
राज्य शासनामार्फत सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. नाटक,कंठ संगीत,उपशास्त्रीय संगीत, वाद्य संगीत,मराठी चित्रपट, कीर्तन, समाज प्रबोधन,तमाशा,शाहिरी, नृत्य, लोककला,आदिवासी गिरीजन आणि कलादान या क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या कलावंतांना दरवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.काही वर्षांपासून प्रत्त्येक राज्य सांस्कृतिक पुरस्काराला त्या- त्या क्षेत्रातील जेष्ठ आणि मोठे योगदान असणाऱ्या कलावंताचे नाव देण्याचे धोरण शासनाने आखले आहे.
त्यानुसार यापूर्वीच शाहीर साबळे यांच्या नावाने शाहिरी, मास्टर विठ्ठल यांच्या नावे चित्रपट, जेष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांच्या नावाने नाटक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंतासाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार दिला जात आहे.
तमाशा क्षेत्रातील राज्य सांस्कृतिक पुरस्कार कोणाच्या नावाने सुरू करावा, यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभाग विचार करीत होते.मात्र कला क्षेत्रात कार्य करणाऱ्या काही संघटनानी तमाशा क्षेत्रात आपले नाव अजरामर करणाऱ्या पहिल्या स्त्री कलाकार सौंदर्य कलावती पवळा तबाजी भालेराव हिवरगावकर यांच्या नावाने तमाशा क्षेत्रातील राज्य सांस्कृतिक पुरस्कार सुरू करावा,अशी मागणी केली होती.याबाबत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख या मागणीवर सकारात्मक असल्याचे समजते.लवकरच यावर ते निर्णय होण्याची शक्यता आहे.
स्वातंत्रपूर्व काळात तमाशामध्ये प्रामुख्याने पुरुष साडी नेसून स्त्री कलाकाराचे पात्र साकार करायचे.मात्र पवळा बाईंनी कै. हरिभाऊ घोलप यांच्या ढोलकी तमाशा फडात पहिल्यादा प्रवेश करून आपल्या कलेला सुरुवात केली.त्यांचा जन्म संगमनेर तालुक्यातील हिवरगाव-पावसा येथे दिनांक १२ ऑगस्ट १८७० रोजी तबाजी व रेऊबाई भालेराव यांच्या कुटुंबात झाला.सौंदर्य आणि गोड आवाजाची देणगी लाभलेल्या पवळा ह्या तेराव्या वर्षी रंगमंचावर आल्या, त्यानंतर शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या सोबतीने त्या तमाशात स्थिरावल्या. त्यानंतर या जोडीने तमाशा रसिकांची मनं जिंकली.परंतु या लावण्यावतीचा कुठेही अथवा सरकार दरबारी नामोनिशाण नाही.त्यांचा शेवटचा काळ अत्यंत वाईट व बिकट परिस्थितीत गेला. पवळा यांनी ६ डिसेंबर १९३९ रोजी जगाचा अखेरचा निरोप घेतला.
सध्या तमाशा सम्राज्ञी कै विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने जेष्ठ तमाशा लोककलावंतांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो.मात्र राज्य सांस्कृतिक पुरस्काराला वयाची अट नसून कला क्षेत्रात आपले किती योगदान आहे,यावरून कलाकारांची निवड केली जाते.