मुंबई -हिमाचल प्रदेश सरकारकडून अभिनेत्री कंगना रणौतला सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंगनाला सुरक्षा मिळावी, अशी विनंती तिच्या कुटुंबीयांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे केली होती. त्यानंतर हिमाचल प्रदेश सरकारने तिला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटलं होतं. सर्वच स्तरांमधून कंगनावर टीकास्त्र डागण्यात येत आहे. त्यामुळेच हि सुरक्षा देण्यात आली आहे .हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कंगनाला पूर्णपणे सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे.
“कंगनाच्या कुटुंबीयांसोबत माझा फोनवर संवाद झाला असून हिमाचल सरकार कंगनाला पूर्ण सुरक्षा देईल. तसंचहिमाचल प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनादेखील तसे आदेश देण्यात आले आहेत. ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत जाणार असून हिमाचलच्या मुलीला सुरक्षा देणं यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत”, असं जयराम ठाकूर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्येच तिने मुंबई पोलिसांवरदेखील काही प्रश्न उपस्थित केले होते. इतकंच नाही तर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटून उठला आहे. यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करुन कंगनाला चांगलेच खडेबोल सुनावले आहे.