पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने मिळवलेले यश अभिनंदनीय आहे. येत्या ३० मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण करतील. या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नेते, सन्माननीय व्यक्ती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सर्वांसाठी शाही प्रीतीभोजनही आयोजिले जाईल. या शाही भोजनात शुद्ध शाकाहारी पदार्थ असावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे स्वतः शुद्ध शाकाहारी आहेत. त्यामुळे या शाही प्रीतीभोजनाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी जगभर शाकाहाराचा संदेश पोहोचावा,” असे आवाहन शाकाहार पुरस्कर्ते आणि सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केले.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “शाकाहार आणि अहिंसा भारतीय संस्कृती व परंपरेचा वारसा आहे. भारतातील विविध भागात अनेक लोकप्रिय आणि स्वादिष्ट पदार्थ आहेत. त्यांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. विदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना आपल्या येथील स्वादिष्ट पदार्थांची चव चाखायला द्यायला हवी. महत्वाची बाब म्हणजे जर्मनी सरकारने सगळ्या शासकीय समारंभात शाकाहारी भोजन अनिवार्य केले आहे. त्यांच्या पर्यावरण मंत्री बार्बरा हैड्रिक्स यांनी फेब्रुवारी महिन्यात हा निर्णय घेतला. ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण हानी याला मांसाहार कारणीभूत आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन शाकाहाराचा पुरस्कार करावा. तसेच आपल्या देशात असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर, मांस निर्यातीवर बंदी घालण्यात यावी.”
या मागणीचे निवेदन डॉ. गंगवाल यांनी ईमेलद्वारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना पाठवले आहे