नवी दिल्ली,भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पृष्ठभूमीवर कॅनडा सरकारने भारतातून प्रवासी उड्डाणांवर लावण्यात आलेली बंदी आज रविवारी उठवली आहे. भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर सुरू असताना कॅनडाने एप्रिलमध्ये ही बंदी घातली होती. आता मात्र ही बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे विमान सेवा देणारी कॅनडा एअर उद्या सोमवारपासून दोन्ही देशांदरम्यान थेट उड्डाणे सुरू करू शकणार आहे. यासाठी नकारात्मक कोविड अहवाल महत्त्वाचा असणार आहे.
तसेच भारतातील एअर इंडिया 30 सप्टेंबरपासून उड्डाण सुरू करू शकणार असल्याचे सांगितले जात आहे. याआधी कॅनडाने भारताकडून सर्व थेट व्यावसायिक आणि खाजगी प्रवासी उड्डाणांवरील बंदी 26 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. आता निर्बंध संपल्याने, भारतातील प्रवासी 27 सप्टेंबरपासून काही नियम व उपायांसह कॅनडाला जाऊ शकणार आहेत. ट्रान्सपोर्ट कॅनडाने यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की, 27 सप्टेंबरपासून भारतातून येणार्या थेट फ्लाईट्स कॅनडामध्ये उतरू शकतात. मात्र, अतिरिक्त सार्वजनिक सुरक्षेचे उपाय करावे लागतील. प्रवास करणार्यांना दिल्ली, विमानतळावरील मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूच्या आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल दाखवावा लागेल. हा अहवाल विमानाच्या उड्डाणाच्या 18 तासांच्या आतला असणे आवश्यक आहे.
कॅनडा सरकारच्या प्रवासी नियमांमध्ये कॅनडाला जाणार्या प्रवाशांना विमानात चढण्यापूर्वी लॅबने जारी केलेला क्यूआर कोड अहवाल एअरलाईनला दाखवावा लागेल, असे म्हटले आहे. ज्यांना पूर्वी कोरोना लागण झाली होती त्यांनी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतील सकारात्मक अहवाल सादर करावा लागेल. ही चाचणी कॅनडासाठी प्रवास करण्याच्या 14 ते 180 दिवसांच्या दरम्यान असावी लागणार आहे.