नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्री झालेल्या भीषण चकमकीनंतर आता हिमाचल प्रदेशमध्ये चीनला लागून असलेल्या भारतीय सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. गलवान खोऱ्यातील या चकमकीमध्ये कर्नलसह २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. चीनच्या बाजूलाही जिवीतहानी झाली आहे.
भारताने इंटरसेप्ट केलेल्या मेसेजनुसार त्यांचे ४३ सैनिक ठार तसेच गंभीर झाले आहेत. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सीमावर्ती भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश पोलिसांनी सर्व गुप्तचर यंत्रणांना सक्रिय केले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
लाहौल, स्पिती आणि किनौर जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील चीनसीमेवर गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये तणाव सुरू होता.गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने आले होते. तणावाची स्थिती निवळण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चाही सुरू होती.परंतु, त्या चर्चेनंतरच हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. देशाची अखंडता आणि राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्य ठामपणे कटिबद्ध आहे, असं भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलंय. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार चीनी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडल्यामुळं हा प्रकार घडला आहे. समुद्र सपाटीपासून उंचावर असलेल्या या भूभागात शून्यापेक्षा खाली तापमान असताना ही चकमक घडली आहे.