जालना-प्राप्तिकर खात्याच्या ‘दुल्हन हम ले जायेंगे ‘नावाने केलेल्या पथकाने जालना जिल्ह्यातील स्टील उत्पादकांवर टाकलेल्या धाडीमुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. गेल्या 8 दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे सुरू असलेल्या या कारवाईत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली. यात सुमारे 58 कोटींची रोकड, 32 किलो सोने, हिरे आणि इतर ऐवजांचा समावेश आहे.पथकांनी छापे टाकताना व्यावसायिक व त्यांच्याशी संबंधित लोकांना मागमूस लागू नये, छाप्याच्या तयारीची बातमी फुटू नये याची पूर्ण सतर्कता बाळगली. नाशिक, पुणे, ठाणे व मुंबईच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांवर जणू काही लग्नाला जात असल्याचे भासवत इनाेव्हा कारवर वर वधूच्या नावाचे स्टिकर लावले, तर काहींनी ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असा मजकूर असलेले वेगवेगळे स्टिकर लावून त्यांना कोडवर्ड दिले होते.
1 ते 8 ऑगस्ट दरम्यान रात्रंदिवस हे छापासत्र सुरू होते. त्यात नाशिक विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकारी सहभागी होते. हे सर्वजण 120 हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून जालन्यात धडकले होते. पण त्याची कुणालाही खबरबात लागली नाही.
प्राप्तिकर विभागाच्या नाशिक अन्वेषण व शोध (डिटेक्शन) विभागांतर्गत औरंगाबादच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील 4 बड्या स्टील कारखानदारांनी आपल्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवले. पण ते पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले. याद्वारे सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचा संशय होता. त्यामुळे नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात 1 ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांतून जाऊन स्टील कारखानदारांवर व्यावसायिकांच्या कार्यालयांसह निवासस्थानावर छापे टाकले.
एकाच वेळी वेगवेगळ्या 5 पथकांनी ही कारवाई केली. त्यात सुरुवातीला काहीच हाती लागले नाही. त्यामुळे या पथकांनी त्यांच्या शहराबाहेरील 8 ते 10 किलोमीटरवरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला. तेथे कपाटांखाली व बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली. आणखी एका व्यावसायिकाच्या घरीही अशीच रक्कम सापडली.
जमिनी, शेती, बंगल्याची बँकेतील कागदपत्रे जप्त
जालन्याच्या या चारही स्टील व्यावसायिकांपैकी तिघांकडे रोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्किटे, विटा, नाणी, हिरे मिळाले. सोन्याच्या 32 किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत 16 कोटी रुपये आहे. या व्यापाऱ्यांची घरे, कार्यालयांतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगले यासह बँकांतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. एकूण सुमारे 300 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा दावा पथकाने केला.
35 कापडी पिशव्यांत नोटांची बंडले केली पॅक
जालन्यात मिळालेली रोकड स्थानिक स्टेट बँकेत नेऊन मोजण्यात आली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली मोजणी रात्री 1 वाजेपर्यंत पूर्ण झाली. त्यासाठी 10 ते 12 यंत्रे लागली. 35 कापडी पिशव्यांत नोटांची बंडले पॅक केली.
एकाच वेळी वेगवेगळ्या 5 पथकांची कारवाई
आयकर विभागाच्या औरंगाबादच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील चार बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवसायातून मिळवत ते पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले आहेत. याचा प्राप्तिकर बुडवल्याचा संशय होता. नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात 1 ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांतून जाऊन स्टील कारखानदार आणि व्यावसायिकांच्या कार्यालयांवर तसेच निवासस्थानी छापे टाकले. एकाच वेळी वेगवेगळ्या पाच पथकांनी ही कारवाई केली.