मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची लढाई सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी!
मुंबई भाजपाची कार्यकारिणी बैठक संपन्न
मुंबई- महानगरपालिकेच्या निवडणुकीची लढाई ही सत्तेसाठी किंवा आपला महापौर बसवण्यासाठी नसून मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ही लढाई असल्याचे प्रतिपादन मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत केले.
मुंबई भाजपाची कार्यकारिणी बैठक दादरमधील वसंत स्मृती मुंबई भाजपा कार्यालयामध्ये पार पडली. या बैठकीचे प्रास्ताविक मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांनी केले. त्यावेळी मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई सरचटणीस व आमदारअमित साटम, मुंबई सरचटणीस संजय उपाध्याय, विधान परिषद विरोधी पक्षनेतेप्रविण दरेकर, खासदार मनोज कोटकजी, खासदार गोपाळ शेट्टी, चिटणीसप्रतिक कर्पे तसेच खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी मंगल जी म्हणाले की, पंतप्रधान म्हणून आपल्याला मोदीजींसारखे उत्तम नेतृत्त्व लाभलं आहे. या सात वर्षांत त्यांनी जी विकासात्मक पावलं उचलली आहेत असे कोणीही करू शकत नाही.आणि तसाच विकास आपल्या मुंबईत करायचा आहे. त्याकरीता आपल्याला ताकदीने उभे राहायचे आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असून मुंबई शहराला आणि मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे काम हे मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने केलेले आहे. त्यामुळे मुंबईचा विकास करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आणायची आहे. मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ही लढाई असल्याचा संकल्प आपण करूया असे आवाहन मंगल जी यांनी उपस्थितांना केले. हा राजकीय प्रस्ताव मांडत पक्षाचे सरचिटणीस व आमदार अमित साटम म्हणाले की, गेल्या २४ वर्षांमध्ये २१,००० कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करूनही मुंबई शहराचे रस्ते हे देशामध्येच नाही, तर संपूर्ण जगामध्ये खड्ड्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत.
आपण जेव्हा एखाद्या शहरामध्ये जातो, तेव्हा त्या शहरामध्ये प्रवास करीत असताना तेथील रस्ते कसे आहेत, त्यावरून आपण त्या शहराची प्रतिमा आपल्या मनामध्ये निर्माण करीत असतो. मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून मुंबई शहराचा नाव लौकिक हा आंतरराष्ट्रीय दर्जावर मोठा असतानाही मुंबई शहराला २५ वर्षांमध्ये साधे चांगले रस्तेही मिळाले नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. तसेच दर पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबई होणे याची सवयच जणू काही मुंबईकरांना झालेली आहे, असे अमित साटम यांनी सांगितले. गेल्या १० वर्षामध्ये नाला रुंदीकरण व ४ पंपिंग स्टेशनच्या प्रकल्पावर ७ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करूनही मुंबईची तुंबई ही दर पावसामध्ये झालेली दिसून येते. दरवर्षी नालेसफाईमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका १०० कोटी पेक्षा जास्त पैसे खर्च करीत असते. परंतु मुंबईकरांचे ८ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे हे नाल्यामध्ये बुडून गेल्याचे चित्र हे मुंबई शहरासमोर दिसून येत आहे. असे आमित साटम यांनी सांगितले.