केंद्रीय अर्थमंत्री, राज्यमंत्री यांच्याशी याबाबत दरेकर बोलणार
मुंबई, दि. ३० डिसेंबर – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. बँका या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. भरदिवसा बँकेमध्ये घुसून, गोळीबार करून पैसे लुटले जात असतील, तर याच्यापेक्षा भयंकर दुसरे काहीही नाही, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.
दहिसर येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या पार्श्वभूमीवर स्टेट बॅंकेच्या शाखेला भेट देण्यासाठी दरेकर गेले होते, त्याप्रसंगी प्रसारमध्यमांशी दरेकर बोलत होते. दरेकर पुढे म्हणाले की, दरोडेखोरांनी आत घुसून गोळीबार केला. कॅशरच्या गल्ल्यातील पैसे काढत पोबारा केला. दरेकर यांनी पोलिसांचेदेखील अभिनंदन केले कारण पाच-सहा तासात दरोडेखोरांना त्यांनी पकडले. बँक अशा पद्धतीने जर लुटायला लागले, तर या शहराची आर्थिक घडीच उद्ध्वस्त होईल. या बॅंकेला एक गार्ड असण्याची आवश्यकता होती. कारण स्टेट बँक देशातील मोठी बँक आहे. परंतु बँकेची धोरणे जर कर्मचाऱ्यांच्या, ग्राहकांच्या जीवावर येणार असतील तर ती बदलण्याची आवश्यकता आहे, असेही दरेकर म्हणाले. याबाबतची विनंती केंद्रीय अर्थमंत्री, राज्यमंत्री यांना करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांची बैठक लावून आज बँकांच्या शाखा अशा प्रकारे गोळीबार करून लुटल्या जात असतील तर ते अत्यंत चिंताजनक, धोकादायक आहे. म्हणून आणखी कडक आणि गतीने काय करता येईल यासंबंधी गृहमंत्र्यांशी बोलणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.