- काँग्रेसतर्फे आज दिल्लीत ‘भारत बचाओ’ रॅलीचे आयोजन
- पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनीच या देशाची माफी मागावी – राहूल गांधी
नवी दिल्ली – राहुल गांधींनी रेप इन इंडिया वक्तव्य केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. दरम्यान, मी माफी मागणार नाही! पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनीच या देशाची माफी मागावी असे राहुल गांधी म्हणाले. दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित भारत बचाओ रॅलीवेळी त्यांनी भाजप सरकारवर घणाघात केला.
या रॅलीत राहूल गांधी आक्रमक दिसून आले. ते म्हणाले की, हा देश मागे हटणारा नाही. मला योग्य बोलण्यासाठी माफी मागायला लावतात. मी गांधी आहे,माफी मागायला काही मी सावरकर नाही , सत्यासाठी मी किंवा काँग्रसेचा कार्यकर्ता कधीच माफी मागणार नाही. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनीच या देशाची माफी मागावी असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींच्या ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावरून शुक्रवारी लोकसभेत गदारोळ माजला होता. केंद्रिय मंत्री स्मृती इराणीसह अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. मात्र मी माफी मागणार नाही असे राहूल यांनी स्पष्ट केले होते.
राहुल गांधी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्द
- शेतकरी, कामगारांशिवाय देशाचा विकास अशक्य.
- देशाच्या तरुणाच्या हातात रोजगार असेल तर विकास होईल.
- विकास दर 9 टक्क्यांवरून थेट 4.5 टक्क्यांवर आणला.
- मोदींनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायला हवी होती.
- शत्रुंनी नाहीतर नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्था कमकुवत केली.
- मोदींनी 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी आणली.
- गेल्या 5 वर्षांत अदाणींना 1 लाख कोटींहून अधिक किमतीची कंत्राट दिली.
- कर जनतेकडून घेतला, कर्जमाफी मात्र उद्योपतींना दिली.
- उद्योगपतींचे 60 लाख कोटींचे कर्ज माफ केले.
- सत्तेसाठी नरेंद्र मोदी काहीही करू शकतात.
‘मोदी है तो मुमकिन है’
प्रियंका यांनी भाजपच्या ‘मोदी है तो मुमकिन है’ या नाऱ्यावर टीका केली. भाजप आहे तर देशात बेरोजगारी, महाग कांदा आणि 4 कोटी नोकऱ्या संपुष्टात येणे शक्य असल्याचे प्रियंका यावेळी म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “न्यायाची लढाई लढण्यासारखी कोणतीही मोठी देशभक्ती नाही. आज आपल्या देशात सगळीकडे अन्याय होत आहे. गरिबांवर अडचणी येत आहेत आणि मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ होत आहेत. असे कायदे केले जातात ज्याद्वारे लाखो लोक कैद्यासारखे ठेवले जातात. आजच्या या लढाईत उभा न राहणाऱ्याला भ्याड म्हटले जाईल. देशाचे रक्षण करणे, स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा हक्क असणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी माझे काँग्रेसचे कार्यकर्ते भाऊ-बहिणी आहेत. देशाला वाचवण्यासाठी ही भावना घेऊन आले आहेत त्याबद्दल धन्यवाद.”