पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची नि:पक्ष चौकशी करावी
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी
दुर्घटनास्थळी दिली भेट
मुंबई, दि. १७- मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी प्रकल्पाची कामे होत असून कोणताही नवा प्रकल्प असला तरीही तेच कंत्राटदार, तेच ठेकेदार व तेच अधिकारी संगनमताने काम करताना दिसून येत आहे. यामुळे कंत्राटदारांमधील बेफिकिरी वाढलेली आहे. कामाचे योग्य प्रकारे नियोजन होत नाही, त्यामुळे एकंदर मुंबईचे सर्व प्रकल्प व त्या प्रकल्पांचे ठेकेदार आणि त्यांची काम करण्याची क्षमता तपासण्याची आवश्यकता आहे. ईडी व सीबीआय चौकशीत ज्या कंपन्या आहेत व ज्या कंपन्या ब्लॅक लिस्टेड केल्या आहेत त्या कंपन्यांना कसे काय टेंडर देता? असा सवाल विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच या दुर्घटनेची नि:पक्ष चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व एमएमआरडीएचे आयुक्त यांच्याकडे लेखी पत्र देऊन केली आहे.
जेव्हीएलआरला जोडणा-या पुलाचा गर्डर अचानक एका बाजूला कलंडल्यामुळे आज पहाटे ही दुर्घटना घडली. विरोधी पक्षनेते दरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, सदर दुर्घटना अतिशय गंभीर स्वरूपाची असून या कामाचे कंत्राटदार जे.कुमार यांनी गर्डरचे काम करताना योग्य मशिनरीचा वापर केला होता का, वापरण्यात आलेली मशिनरी वापरण्यास योग्य होती का, कामाच्या ठिकाणी कामगार व अभियंता यांच्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना होत्या का? हे काम सुरु असताना जबाबदार अधिकारी व वरिष्ठ अभियंता उपस्थित होते का? तसेच या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे, असे अनेक प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केले.
दरेकर यांनी सांगितले की, ही दुर्घटना गर्डरचे बेअरिंग आणि नटबोल्ट यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरीही त्याची पूर्ण चौकशी करून त्यानंतरच दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली असून या दुर्घटनेत २१ कामगार जखमी झाले. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु या दुर्घटनेस कंत्राटदारांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असून एमएमआरडीए अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांवर नियंत्रण दिसून येत नाही. आज जर वाहतुकीचा व प्रवासाचा हा मार्ग असता तर मोठी दुर्घटना झाली असती. मुंबईत अशा प्रकारच्या घटना वारंवार होणे हे दुर्दैवी आहे. मुंबईत अचानक कधी स्कायवॉक पडतो तर कधी स्लॅब कोसळतो, अशी टीकाही त्यांनी केली.
दरेकर यांनी यावेळी एका एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याला धारेवर धरले. ते म्हणाले, वेळेत बोलावूनही संबंधित अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. पाहणी झाल्यानंतर एक अधिकारी आले. इतके संवेदनहीन अधिकारी आपण कधी पाहिले नाहीत. आयुक्तस्तरावरचा नाही परंतु कनिष्ठ अभियंता स्तरावरचा सुद्धा एकही अधिकारी या पाहणी दरम्यान उपस्थित नव्हता. यावरून या अधिका-यांची संवेदनशीलता किती आहे हे दिसून येते. सरकारचाच या यंत्रणांवर अंकुश नसल्यामुळे हे अधिकारी बेफिकीरपणे वागत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.