मुंबई- ‘सरकारने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची एक समिती स्थापन करुन मराठा आरक्षणावर तोडगा काढावा’,असा सल्ला राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.
आज पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, कोणत्याही कायद्याला कधीच स्थगिती मिळत नाही. तसे कोर्टाचे संकेत आहे. कोर्ट फक्त ऑर्डिनन्सला स्थिगिती देतात. मात्र सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळे कोर्टाने कायद्यालाच स्थिगिती दिली होती. तेव्हाच आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. त्याचाच परिणाम म्हणून आजचा निकाल आला आहे. आता सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकिलांची एक समिती स्थापन करावी आणि आरक्षणावर काही तोडगा काढता येतो का, ते पाहावे, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले की, सरकारने लार्जर बेंचकडे जाणार म्हणून सांगितले. पण कित्येक दिवस पुनर्विचार याचिकाच दाखल झाली नाही. या बेंच समोरही समन्वयाचा अभाव राहिला. गायकवाड कमिशनचा अहवालही भाषांतरीत केला नाही. गायकवाड कमिशनला विरोध कसा झाला नाही, असा सवाल कोर्टाने केला होता. हा एकतर्फी तयार केलेला रिपोर्ट होता का? असा प्रश्नही कोर्टाने विचारला. त्याचाही सरकारला प्रतिवाद करता आला नाही. कोर्टाने 50 टक्क्याच्यावरचं आरक्षण रद्द केलं. पण नऊ राज्यात 50 टक्क्यांवर आरक्षण आहे, ते रद्द झालेले नाही. त्यांच्या केसेस सुरू आहे. आपलं आरक्षण मात्र रद्द झालं, असेही ते म्हणाले.