नवी दिल्ली. सीबीएसई आणि सीआयएससीईने दहावी आणि बारावीच्या १ ते १५ जुलैदरम्यान होणाऱ्या उर्वरित विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दोन्ही मंडळांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाची माहिती दिली. मात्र, मंडळाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीबाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कोणताही निकाल दिला नाही. न्यायालयाने शुक्रवारी १०.३० वाजेपर्यंत पर्यायी परीक्षा आणि निकालाशी संबंधित विविध बाबींवर सरकारकडून माहिती मागवली आहे. त्याआधारे अंतिम सुनावणी होईल.
ईशान्य दिल्लीतील हिंसाचारामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली होती. तर कोरोनामुळे १२वीची परीक्षा थांबवावी लागली. ती जुलैमध्ये होणार होती. मात्र त्या रद्द कराव्या व अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याची मागणी करत काही पालक सुप्रीम कोर्टात गेले होते.
आयआयएम रोहतकची प्रवेश परीक्षा स्थगित करण्याची मागणीही फेटाळली
– सरकारच्या स्पष्टीकरणातून समाधान न झाल्याने कोर्टाने शुक्रवारी सकाळपर्यंत सुनावणी स्थगित करत सीबीएसईला कोणतेही निर्देश देण्यास नकार दिला. सरकारकडून सर्व मुद्द्यांवर नव्याने म्हणणे मागवले.
– एका वकिलाने २८ जूनची आयआयएम रोहतकची प्रवेश परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली. यावर न्या. खानविलकर यांनी सुनावले की, संबंधितांना येऊ द्या. आम्ही येथे बसून संस्था चालवू शकत नाही.
केंद्राने सांगितले-मूल्यांकनाच्या आधारे १०वी-१२वीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागेल
न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. वाचा सुप्रीम कोर्टातील सुनावणी लाइव्ह…
– तुषार मेहता : दहावी आणि बारावीच्या जुलैत होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. महामारीत परिस्थिती भयावह आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडूनेही परीक्षा घेणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाची स्थिती सुधारल्यानंतर १२वी उर्वरित परीक्षा होऊ शकते.
– ऋषी मल्होत्रा (पालकांचे वकील): यामुळे शैक्षणिक सत्राला उशीर होईल. स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना गमवावी लागेल.
– न्या. खानविलकर: निकाल केव्हा जाहीर होईल हे सरकारने सांगावे. नवे शैक्षणिक सत्र कसे निश्चित केले जाईल? जर तुम्ही १२ची परीक्षा भविष्यात पुन्हा कधी घेणार असाल तर इतर परीक्षादेखील स्थगित कराव्या लागतील. परीक्षा ऑगस्टमध्ये झाली तर शैक्षणिक सत्र सप्टेंबरमध्ये सुरू होईल.
– मेहता : नामांकन आता केवळ अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे होईल. विद्यार्थी त्याआधारे फॉर्म भरू शकतील. मूल्यांकनाच्या आधारे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर केले जातील.
कोर्टाने परीक्षा घेण्याबद्दल, निकालाबाबत माहिती मागवली
– आयसीएसई: १०वी आणि १२वी या दोन्ही वर्गांतील विद्यार्थ्यांना आता नंतर परीक्षा देण्याची गरज नाही.
– कर्नाटकात गुरुवारी इयत्ता दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी सुमारे ८.४० लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दुसरीकडे लखनऊ विद्यापीठाच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या परीक्षांना विरोध करत त्या स्थगित करण्याची मागणी केली.
शिक्षण मंडळाच्या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे
सीबीएसई : दहावीची परीक्षा होणार नाही, बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय
– दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यांना आता परीक्षा द्यावी लागणार नाही. अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे त्यांना गुण दिले जातील.
– बारावीची १ ते १५ जुलैदरम्यान होणारी परीक्षा स्थगित. विद्यार्थ्यांना मागील तीन परीक्षांच्या आधारे अंतर्गत मूल्यांकन करून गुण दिले जातील. ज्यांना हा पर्याय मान्य नसेल त्या विद्यार्थ्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर होणारी परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
आयसीएसई : दहावी आणि बारावी अशा दोन्ही परीक्षा रद्द. बारावीच्या विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा द्यावी लागणार नाही.
शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर
सीबीएसईने शिक्षकांच्या नियुक्तीसाठी घेण्यात येणारी केंद्रीय पात्रता परीक्षा सीईटी पुढे ढकलली. मंत्री रमेशकुमार पोखरियाल यांनी ही माहिती दिली.