जळगाव – राज्यभर गाजलेल्या जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्यात 48 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने दोषी ठरवलेल्यांमध्ये माजी मंत्री सुरेश जैन यांचाही समावेश आहे. सर्व संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान यात माजी मंत्री सुरेश जैन यांना 7 वर्षे कारावास व 100 कोटींचा दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.राज्यभर गाजलेल्या जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह सर्व 48 जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सर्व संशयिताना ताब्यात घेण्यात आले. आरोपीना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. माजी मंत्री सुरेश जैन यांना 7 वर्षे कारावास व 100 कोटी दंड, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना 5 वर्षे कारावास व 5 लाख दंड, राजा मयूर व जगन्नाथ वाणी यांना 7 वर्षे कारावास व प्रत्येकी 40 कोटी दंड, प्रदीप रायसोनी यांना 7 वर्षे कारावास व 10 लाख दंड, मुख्याधिकारी पी.डी. काळे यांना 5 वर्षे कारावास व 5 लाख दंड सुनावला. माजी नगराध्यक्ष पुष्पां पाटील यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली व 1 लाख दंड केला. पाटील यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
काय आहे प्रकरण?
सुरेश जैन यांना 10 मार्च 2012 रोजीच अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर 2006 मध्ये जळगाव महापालिकेतील घरकुल योजनेत 29 कोटींच्या गैरव्यवहारांची चौकशी सुरू होती. या दरम्यान जैन अनेक वेळा जामीनावर सुटण्याचा प्रयत्न करत होते. अखेर 2016 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात 48 जणांना आरोपी केले होते. त्या सर्वांनाच न्यायालयाने दोषी ठरवले आहे.