नागपूर -कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी करत सोमवारी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.विधिमंडळ अधिवेशनात सोमवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार आणिअब्दुल सत्तार यांनी केलेल्या घोटाळ्याची २८९ अन्वये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनी सभागृहात पोलखोल केली. भव्य कृषी-क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवात सरकारी अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा खडसे यांनी केला.यासाठी वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा दाखला त्यांनी दिला. एकंदरीत १५ कोटी रुपयांची उलाढाल या प्रकरणात होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. एका बाजूला गायरान जमीन देण्याचा राज्य मंत्र्यांना अधिकार नसतानाही गायरान जमीनीचे वाटप करणे तसेच अधिकाऱ्यांना वेठीस धरून पैसे गोळा करण्याचे प्रयत्न करणे हे नीतीमत्तेत बसते का असा सवाल खडसे यांनी सत्ताधाऱ्यांना केला.अशाप्रकारचा भ्रष्टाचार जबाबदार व्यक्तीकडून होत असेल तर या संपूर्ण घटनेची चौकशी करून हा पैसा नेमका जातो कुठे, त्याचे नियम काय,राज्यात सर्वत्र ही वसुली सुरू असल्याने घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी सभागृहात केली.
मंत्री अब्दुल सत्तार यांचायविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली. राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे… गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को… 50 खोके एकदम ओके… सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके… वसुली सरकार हाय हाय… श्रीखंड घ्या कुणी, कुणी भूखंड घ्या…अशा घोषणा यावेळी दिल्या. माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या , मुख्यमंत्री राजीनामा द्या… द्या खोके, भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके… कर्नाटक सरकार हाय हाय… मिंधे सरकार हाय हाय… निर्लज्ज सरकार हाय हाय… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… गली गली मे शोर है खोके सरकार चोर है… संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे… धानाला भाव मिळालाच पाहिजे… अशा गगनभेदी घोषणा देत आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत जोरदार घोषणाबाजी केली.
नेमके प्रकरण काय?
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलून अब्दुल सत्तार यांनी मौजे गोडबाभूळ (ता. जि. वाशीम) येथील गट नंबर 44 मधील 37 एकर 19 गुंठे सरकारी गायरान जमिनीचे एका व्यक्तीला वाटप केले. या जमिनीची किमंत साधरणतः दीडशे कोटी रुपये आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही हा निर्णय अवैध पत्र 5 जुलै 2022 ला महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना लिहिले. सर्वोच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही याप्रकरणी ताशेरे ओढलेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेत अजित पवार आणि विधान परिषदेत एकनाथ खडसे आणि अनिल परब यांनी केली.
.