पुणे- एकाच कुटुंबातील व्यक्ती जर खासगी मोटारीमधून प्रवास करीत असतील तर त्यांनी मास्क लावणे अनिवार्य नाही. परंतु, प्रवासी वाहतूक करणा-या मोटारी, ओला-उबेरसारख्या मोटारींमधून प्रवास करीत असताना चालकासह सर्वांनी मास्क लावणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठकीमध्ये चर्चा झाली. नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील कौटुंबिक वापराच्या मोटारींमधून प्रवास करणाऱ्यांना आता मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. पालिकेने हा नियम शिथील केला असून केवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारींमध्येच मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची घटलेली संख्या लक्षात नागरिकांकडून ही मागणी केली जात होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाच्या निदेर्शांनुसार, विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पालिका आणि पोलिसांकडून एकत्रितपणे ही कारवाई केली जात असून आतापर्यंत दहा कोटींपेक्षा अधिक दंड वसुल करण्यात आला आहे. दुचाकी चालक, चारचाकी चालक, तीन चाकी आणि पादचाऱ्यांवर कारवाई होत आहे. या कारवाईला विरोध नसला तरी कारवाईमधून मोटारीला वगळावे अशी मागणी नागरिकांनी केलेली होती. मोटारीच्या काचा बंद असतात, एकाच कुटुंबातील अथवा निकटच्या संपर्कातीलच माणसे एकत्र प्रवास करीत असतात. गाडीच्या काचा बंद असल्याने त्याचा इतरांना काहीही धोका नसतो असे नागरिकांचे म्हणणे आहे.