राष्ट्रीय पातळीवर आता मराठी मतदारांना हक्काचे व्यासपीठ मिळणार,
नवीदिल्ली, दि. १८ – राजधानी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या सर्व राज्यांतील मराठी मंडळ व संघटनांच्या राष्ट्रीय स्तरावरील बैठकीत राजधानी दिल्ली सोबतच देशातील प्रत्येक राज्यात मराठी माणसांचे राजकीय नेतृत्व उभे करण्याचा महत्वपूरृण निर्णय घेण्यात आला.
सामाजिक तसेच सांस्कृतिक चळवळीनंतर राजकीय नेतृत्वाची फळी उभारण्याच्या दिशेने सर्व राज्यातील प्रमुख मराठी संघटना व मंडळांकडून उचलण्यात आलेले हे आगळे वेगळे पाऊल आहे. या बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, देशातील सर्व राज्यांमधील मराठी लोकांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि आपल्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक राज्यात तरुण व तडफदार चेहऱ्यांच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व दिले जावे, हा या निर्णयामागचा विचार आहे. या प्रस्तावाद्वारे देशातील पहिले मराठी राजकीय व्यासपीठ ‘राष्ट्रीय मराठी मोर्चा ‘ या नावाने स्थापन करण्यात आले असून देशाच्या राजधानीत, दिल्लीत गेल्या 12 वर्षांपासून भाजप मध्ये सक्रीय असलेले तसेच राजकीय कामकाजाची जाण व सचोटी असणारे भाजप नेते श्री आनंद रेखी यांना राष्ट्रीय मराठी मोर्चाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यात आले.
“राष्ट्रीय मराठी मोर्चाचे प्रमुख उद्दिष्ट मराठी समाजातील मान्यवरांना महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये राजकीय चेहरा म्हणून पुढे आणणे व त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणे हे आहे. या प्रयत्नामुळे देशात मोठ्या राजकीय वाटचालीची सुरुवात होईल. भविष्यात योग्य उमेदवारांना पुढे करून त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी सर्व मराठी बांधवांना एकत्रित येण्याची आवश्यकता आहे”, असे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री आनंद रेखी यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय मराठी मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार ग्रहण केल्यानंतर पुढे बोलताना श्री आनंद रेखी म्हणाले की, लवकरच राजधानी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय व राज्य पातळ्यांवरील कार्यकारिण्या जाहीर करण्यात येतील. विशेष म्हणजे, इतर राज्यांच्या व भाषिकांच्या राजकीय संघटना व मोर्चे देखील देशात आहेत. पण ते सीमित राज्यांमध्येच सक्रीय आहेत. मात्र; राष्ट्रीय मराठी मोर्चा हा येणार्या काळात देशातील सर्व राज्यांमध्ये आपल्या शाखांची स्थापना करेल.