मुंबई (प्रतिनिधी)- राज्यात बांधकाम मजुरांच्या धर्तीवर “शेत मजूर बोर्ड” स्थापन करावे अशी जोरदार मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉरमिस्ट) पक्षाच्या एका शिष्टमंळाने उपमुख्मंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना भेटून केली आहे.याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे ना.पवार यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
शेती प्रधान देशात शेतावर राबणाऱ्या शेतमजुरांसाठी कोणतेही महामंडळ अस्तित्वात नाही. पण आता लवकरच शेतमजुरांसाठीही शेत मजूर बोर्ड स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकार यासाठी सकारात्मक विचार करीत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी सांगितले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉरमिस्ट) पक्षाने याबाबत राज्य सरकारकडे मागणी केली होती.
राज्यातील हमालांच्या उन्नतीसाठी माथाडी महामंडळ आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांकरिता मजूर सहकारी संस्था कार्यरत आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघाटीत कामगारांसाठी सुद्धा नोंदणी करण्याची तरतूद आहे. पण शेतावर राबणाऱ्या भूमिहीन आणि शेतमजुरांकरिता कोणतेही बोर्ड नाही. त्यामुळे ज्या शेतमजुरांवर शेती टिकून आहे. देशाचे पोट भरले जाते. त्यांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकारने एखादे स्वतंत्र बोर्ड निर्माण करावे अशी मागणी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉरमिस्ट) च्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे.
यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष समाधान नावकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मुस्ताक मलिक, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष बनसोडे, राष्ट्रीय सचिव संजय कांबळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीरभाऊ सोनावणे, मुंबई युवा अध्यक्ष भास्कर खरात, युवा नेते निरंजन लगाडे, हर्षवर्धन नावकर, मंगेश आहिरे, महेश गायकवाड, संदेश तांबे या शिष्टमंडळात समावेश होता.
या भेटीत पदाधिकऱ्यांनी दोघांनाही प्रत्यक्ष भेटीत लेखी निवेदन दिले. त्यावेळी शेतमजूर बोर्डाची मागणी रास्त असून हे बोर्ड कामगार विभाग, कृषी विभाग अथवा महसूल विभागा अशा नेमके कोणत्या खात्यात बसते त्याची माहिती घेऊन बोर्ड स्थापन करण्याबाबत नक्की विचार केला जाईल असेही आश्वासन अजित पवार यांनी दिले. तर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, हे अधिवेशन दोन दिवसाचे आहे. तुमची मागणी चांगली आहे. मी नक्कीच मार्ग काढेल. दरम्यान या मागणीसाठी नावकर यांनी कार्यकर्त्यांसमावेत राज्यपालांची देखील भेट घेतली. त्यांनीही मागणीचे कौतुक करीत याबाबत राज्याला कळवू असे आश्वासन दिले.अशी माहिती पक्ष अध्यक्ष समाधान नावकर यांनी दिली.
आपला